महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’वरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खोचक ट्विट केलं आहे. आज वसुली बंद आहे की चालू? असं ट्विट करत अमृता फडणवीस यांनी खोचक टोला महाविकास आघाडीला लगावला आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे.
दरम्यान, यावरुन अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगवला आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी कोणी मला सांगेल का की, आज वसुली चालू आहे की बंद? असं म्हटलं आहे. भाजप सातत्यानं वसुली सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी याच पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे.
Can anyone update me –
आज वसूली चालू है या बंद ?#MaharashtraBandhNahiHai— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) October 11, 2021
‘बंद’ सरकारचा ढोंगीपणा उघड – देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र बंद पुकारून महाविकास आघाडी सरकारने निव्वळ ढोंगीपणा केला आहे. या नेत्यांना शेतकर्यांप्रति खरोखर कणव असेल तर आजचा बंद मागे घेण्यापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हे पूर्णत: ढोंगी सरकार आहे. उत्तरप्रदेशातील लखीमपूरच्या घटनेत कारवाई होईलच. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्यात लक्ष घातले आहे आणि तेथील सरकार कारवाई करण्यासाठी समर्थ आहे. मात्र, आज महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. राज्यात २००० शेतकर्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांना ना कर्जमाफीचा लाभ, ना कोणती मदत. अशात त्यांना मदत देणे सोडून सरकारपुरस्कृत दहशतवाद या नेत्यांनी हाती घेतला आहे. निष्पाप लोकांना मारहाण केली जात आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने जनतेला बंद करण्यासाठी बाध्य केले जात आहे. संपूर्ण सरकारी व्यवस्थेचा हा मोठा गैरवापर आहे. मावळमध्ये निष्पाप शेतकर्यांवर गोळीबार होतो, राजस्थानमध्ये शेतकर्यांना लाठ्या-काठ्यांनी तुडविले जाते, तेव्हा यांना जालियनवाला बाग आठवत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.