अमरावतीमध्ये उमेश कोल्हा यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अतिशय गंभीर असून ज्या पद्धतीनं मारण्यात आले ते भयानक आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. मास्टरमाईंडलाही अटक झाली आहे. एनआयए या प्रकरणाचा तपास करत आहे. बाहेरचे कुठले कनेक्शन आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात काही बाहेरील शक्तीचा हात आहे का, याचा तपास होईल. या प्रकरणी सर्व बाजू लवकरच समोर येतील, असंही फडणवीस यांनी सांगितले.
धागेदोरे आता तपासले जातील –
उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीरावर जखमांचे घाव आहेत. शवविच्छेदन अहवालात पाच ते सात इंज खोल जखमा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी विदेशी शक्तीचा हात असू शकतो. एनआयए याचा तपास करत आहे. विदेशी कनेक्शन आहे का, या दिशेने तपास सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. उदयपूरच्या घटनेनंतर ही घटना घडली आहे. उदयपूरमध्ये कन्हैयालाल या टेलरचा खून करण्यात आला. अशीच घटना अमरावतीत घडली. उमेश कोल्हे यांनी सोशल माध्यमात नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट टाकली. यावरून हा खून झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मास्टरमाईंड इमरान खानला अटक करण्यात आली आहे. शिवाय ज्या पाच मारेकऱ्यांनी हा खून केला, त्यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. परंतु, इमरान खानला रसद कुणी पुरविली. याचे धागेदोरे आता तपासले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सखोल चौकशी करण्याची अनिल बोंडेंची मागणी –
उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या झाली, असा आरोप भाजपने केला. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते व खासदार अनिल बोंडे व भाजपचे राज्य प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय यांनी केली होती. दरम्यान याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयए पथक व ATS अमरावती शहरात दाखल झाले आहे.