धर्मवीर आनंद दिघे यांच्याबाबत जी घटना घडली, त्याचा मी साक्षीदार आहे, वेळ आल्यानंतर मी त्यावर भाष्य करणारच आहे. मी मुलाखत देईन तेव्हा राज्यात भूकंप होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावमधील क्रीडा संकुलात बोलत होते. दरम्यान, दिघेंबद्दल काय घडलं हे माहित होतं तर गप्प का बसलात?, असा सवाल धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला आहे.
केदार दिघे यांनी आपल्या फेसबूक पोस्टवरून एकनाथ शिंदेंना जाब विचारला आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. मग मी म्हणतो की, इतके दिवस गप्प का बसलात?, माहित असूनही तुम्ही २५ वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?, असा सवाल केदार दिघेंनी उपस्थित केला आहे.
आज तुम्हाला सगळं सांगत नाही. पण जसंजसं समोरून बोलणं येईल. तसं मलाही तोंड उघडावं लागेल. मी तोंड उघडले तर भूकंप होईल. मी कधीही खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाही. मला तशी शिकवण बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली नाही. पण अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची त्यांची शिकवण आत्मसात केली आहे. धर्मवीरांच्या बाबतीत जे काही झालेल आहे त्याचं चित्रपटात उदाहरण दिलेलं आहे. प्रत्यक्ष जीवनात त्यांच्याबाबतीत काय घडलं आहे, त्यावर योग्य वेळी बोलेन, असं एकनाथ शिंदे मालेगावात म्हणाले.
मालेगावला निघण्यासाठी ठाण्याहून निघालो तेव्हा रात्री १२-१ वाजपेर्यंत लोक रस्त्यावर उभे होते. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंची शिवसेना पुढे न्यायची आहे. पण आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झाले. त्याचा खुलासा लवकरच करणार असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.
हेही वाचा : धर्मवीर दिघेसाहेबांची घटना सांगितली तर भूकंप होईल, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा