घरताज्या घडामोडीपंढरपूर यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्या, परिवहन मंत्र्यांचे एसटी अधिकाऱ्यांना निर्देश

पंढरपूर यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची काळजी घ्या, परिवहन मंत्र्यांचे एसटी अधिकाऱ्यांना निर्देश

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांनंतर यावर्षी आषाढी एकदशीनिमित्त वारी सोहोळा होत आहे. वारीसाठी राज्यभरातून असंख्य पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. यंदा लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भक्तांची संख्या पाहता त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, त्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करा, त्यांना पिण्यासाठी नाममात्र दरात स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्या, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी शुक्रवारी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, यात्रेदरम्यान महामंडळाने वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयी-सुविधांची आपण स्वत: पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी परब यांनी ४ हजार ७०० गाड्या सोडणार असल्याचे घोषित केले. पंढरपूर यात्रेदरम्यान एसटीच्या प्रवासी वाहतूकीला अनन्यसाधारण महत्व असते. त्यामुळे वारकरी, भाविक तसेच प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूरपर्यत घेऊन जाणे त्याचबरोबर श्री विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना सुखरूपपणे घरी सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असते.

- Advertisement -

यंदा यात्रेसाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर परब यांनी आज मंत्रालयातील दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचाल शेखर चन्ने यांच्यासह विविध विभागांचे महाव्यवस्थापक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वारकरी तसेच सर्वसामान्य नागरीक हे एसटीचे खरे प्रवासी दैवत आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच नागरीकांची काळजी घेणे आपले काम आहे. भरपावसात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर येथे पालख्यांसोबत चालत येतात. त्यांच्या सेवेसाठी एसटीनेही हातभार लावत त्यांच्या आरोग्यावी काळजी घेण्यासाठी पंढरपूर येथे आरोग्य शिबिर आयोजित करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

- Advertisement -

पंढरपूर येथे तात्पूर्ती स्वरूपात उभारण्यात येणाऱ्या चार एसटी स्थानकांवर हे शिबिर आयोजित करावे, असे निर्देशही मंत्री, ॲड. परब यांनी दिले. यात्रेदरम्यान इंधनाचा आवश्यक साठा करून ठेवा. प्रवासादरम्यान बस बंद पडल्यास पर्यायी बसेसची व्यवस्था करा. तसेच वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी चालकांना वेगावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना द्या, असे निर्देशही यावेळी ॲड. अनिल परब यांनी दिले.

ग्रुप आरक्षणाला प्राधान्य

आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी राज्यभरातील असंख्य गावातून लाखोंच्या संख्येने नागरीक पंढरपूरकडे रवाना होत असतात. मात्र, अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने ग्रुप आरक्षणाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले. नागरीकांनी ग्रुप बुकिंग केले तर त्यांना गावच्या ठिकापासून ते पंढरपूर येथील विठूरायाच्या दर्शनानंतर त्यांना थेट त्यांच्या गावात सोडण्याची व्यवस्था केली जाईल, असेही ॲड. परब म्हणाले.


हेही वाचा : माझ्या मताचा अधिकार संजय राऊतांना देऊन टाका, आमदार भुयारांची खोचक टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -