एसटी कामगारांच्या संपाच्या पहिल्या दिवसापासून गुणवंत सदावर्ते हे कामगारांची दिशाभूल करीत होते. संपूर्ण विलिनीकरण मिळवून देतो असे सांगून दिशाभूल केली. त्यानंतर संपाचे अपयश लपवण्याठी हल्ल्याचे षडयंत्र रचले, असा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी शनिवारी येथे केला.
जे कर्मचारी कोरोना काळात मृत्युमुखी पडले त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे ५० लाख रुपये दिले. एसटी तोट्यात असतानाही मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना मदत केली. मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना एसटीत नोकरी देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे. यामध्ये सदावर्ते यांचे कोणतेही श्रेय नाही. किंबहुना त्यांना कामगारांना कोणतीही गोष्ट सरकारकडून मिळवून दिलेली नाही, असेही परब यांनी आज प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना स्पष्ट केले.
कामगारांना कामावर हजर होण्यासाठी मुदत द्या असे आदेश न्यायालयाने दिले. पण आम्ही त्यापूर्वी ३० मार्चपर्यंत कामावर हजर होण्याचे आश्वासनच दिले होते. कामगारांची एकही नवीन वेगळी मागणी सदावर्तेंनी मान्य करून घेतली दम नाही. सदावर्ते यांनी स्वतःचे अपयश लपवून ठेवण्यासाठी य अशा पध्दतीचा मार्ग वापरला जातोय का याचा पोलिस तपास करीत आहेत, असेही परब म्हणाले.
एसटी संपाच्या संदर्भात अनिल परब म्हणाले, राज्य सरकारने यापूर्वीच तोडगा काढला होता. पहिल्या टप्प्यात ४१ टक्के पगारवाढ दिली. सर्व कारवाया मागे घेतल्या होत्या . मागील करारामधील जे प्रश्न होते, ते मार्गी लावले. कोणताही प्रश्न बाकी ठेवला नव्हता. संप मागे घेऊन बाकीच्या ज्या काही मागण्या असतील तर चर्चा करण्याची तयारीही राज्य सरकारने दाखवली होती. पण चुकीच्या, दिशाहिन ,भरकटलेल्या नेतृत्वामुळे हा संप चिघळला.
कायदा हातात घेतला तर कडक कारवाई होणारच. राज्य सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही.कामगारांनी कामावर हजर व्हावे, असं अनिल परब म्हणाले.
हेही वाचा : तुम्ही व्यक्तिगत माणसाच्या घरावर का जात आहात?, जितेंद्र आव्हाडांचा सवाल