वेतनवाढ आणि अन्य मागण्या मान्य करूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरुच असून या संपामुळे आतापर्यंत राज्याचे ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे आंदोलन करणाऱ्या ५५ हजार एसटी कर्मचाऱ्यांना नोटीस बजाविण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी दिली. एसटी खड्ड्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही परब यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांना केले.
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना वेगवेगळे प्रस्ताव दिल्यानंतरही अनेक कर्मचारी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कामावर परतत असले तरी अनेक कर्मचारी अजूनही कामावर आलेले नाहीत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून आता महामंडळाने एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे आणि राज्याचे मोठे नुकसान
सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेताना दुसरीकडे कामावर हजर न होणाऱ्या ५५ हजार संपकऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. एसटी आंदोलनामुळे शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मी स्वतः अनेक कर्मचाऱ्यांना भेटून आवाहन केले आहे. विलिनीकरणाचा निर्णय समिती घेणार असल्याने संप सुरू ठेवण्याला अर्थ नाही. आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक आणि राज्याचे मोठे नुकसान होत आहे, असेही परब यांनी सांगितले.
आम्हाला कर्मचारी भरती करावी लागेल
एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जसे आमचे दायित्व आहे तसे राज्याच्या बाबतीत देखील आमचे दायित्व आहे. इतक्या वेळी आवाहन करून देखील जर ऐकणार नसतील कारवाई शिवाय पर्याय नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांची कारवाई मागे घेण्याचा प्रश्न येतच नाही. व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आम्हाला कर्मचारी भरती करावी लागेल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रवर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंघावत आहे. मागच्या वेळी राज्यावर खूप संकटे आली, त्यासाठी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांची तब्येत सुधारत आहे. त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांची तब्येत ठणठणीत व्हावी यासाठीही आम्ही देवाकडे प्रार्थना केली असल्याचे अनिल परब म्हणाले.
हेही वाचा : नागपुरात दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसराची रेकी