घरमहाराष्ट्रअण्णा हजारेंचे आता समांतर कृषी आंदोलन

अण्णा हजारेंचे आता समांतर कृषी आंदोलन

Subscribe

आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलन करणार असल्याचे म्हटले पत्रात

गेले १९ दिवस शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. काही शेतकर्‍यांनी तर उपोषणही सुरू केले आहे. अशा परिस्थितीत या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उडी घेतली आहे. अण्णा हजारे यांनी समांतर आंदोलनाची घोषणा करताना मागील आंदोलन स्थगित करतेवेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलन करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे. शिवाय नव्या कृषी कायद्यांसंबंधी पत्रात काहीही भाष्य केलेले नाही. ‘हे आंदोलन केव्हा, कसे व कोठे केले जाईल, याचा तपशील लवकरच जाहीर करू,’ असे पत्र हजारे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठविले आहे.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबरला भारत बंद पाळण्यात आला होता. त्यामध्ये हजारे यांनी सक्रिय सहभाग घेत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. पूर्वी आपल्याला सरकारने दिलेल्या आश्वासनांचे पुढे काहीच झाले नाही, असे सांगत वेळ पडल्यास आपण पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर आज हजारे यांनी कृषीमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी पूर्वीच्या आंदोलनात केलेल्या मागण्या आणि त्यावर सरकारने दिलेली आश्वासने यांचाच उल्लेख केला आहे. त्यामुळे हजारे यांचे आंदोलन झालेच तर ते दिल्लीतील शेतकर्‍यांच्या मुद्यांपेक्षा वेगळ्या मुद्यांवर असणार आहे.

- Advertisement -

कृषीमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, ५ फेब्रुवारी २०१९ रोजी राळेगणसिद्धी येथे तत्कालीन कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह तत्कालीन अन्य मंत्र्यांसोबत शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावेळी उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांवर केंद्र सरकारने लेखी आश्वासन दिले होते. केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायतत्ता देणे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून कृषी मालाचा उत्पादन खर्च व किमती ठरविणे अशा अनेक मुद्यांवर चर्चा झाली होती. या सर्व मुद्यांवर योग्य तो निर्णय घेण्यासाठी उच्चाधिकार समिती नियुक्त करण्यात येईल. ही समिती ३० ऑक्टोबर २०१९ पर्यंत अहवाल सादर करील आणि सरकार त्यावर पुढील कार्यवाही करील, असे आश्वासन आम्हाला देण्यात आले होते. त्यामुळे उपोषण मागे घेतले होते. मात्र, आतापर्यंत त्यावर पुढे काहीच हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे त्या दिवशी स्थगित करण्यात आलेले उपोषण आता पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे. हे उपोषण केव्हा व कोठे करायचे हे नक्की झाले की पत्राद्वारे कळविण्यात येईल, असेही हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. यात नव्या कृषी कायद्यांसंबधी हजारे यांनी कोणताही उल्लेख केला नाही अगर विरोध किंवा पाठिंब्याची भूमिकाही जाहीर केलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -