मुंबई : नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना काल, सोमवारी समोर आली होती. तर, आज (मंगळवार) काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आणखी सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी, सत्तेतील तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा – मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल पायउतार होणार? मुख्यमंत्री शिंदेंचा अल्टिमेटम
नांदेमधील शासकीय रुग्णालयात गेल्या दोन दिवसांत 31 जणांचा मृत्यू झाला. त्यात 16 बालकांचा समावेश आहे. या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तीनतीगाडा सरकारने राज्यातील आरोग्यव्यवस्थेचे हाल किती दयनीय करून ठेवले आहे त्याचे उदाहरण म्हणजे ही घटना, असल्याची टीका विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली. दिरंगाई, दुर्लक्ष आणि बेदरकारपणा यामुळे वारंवार महाराष्ट्रातील जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे. अजून कितीदा पुन्हा पुन्हा हेच घडू देणार? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. तर, सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे अनेक आयांनी आपली लेकरे गमावली आहेत. त्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय.…
— Raj Thackeray (@RajThackeray) October 3, 2023
त्या पाठोपाठ राज ठाकरे यांनी ट्वीट करत, ठाण्यामध्ये घडलेल्या अशाच एका घटनेचा संदर्भ देत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर निशाणा साधला आहे. नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासांत 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधांचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातो, असे समजले असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – भाजपाच्या दृष्टीने गरिबांच्या जीवाची किंमत नाही; नांदेड घटनेनंतर राहुल गांधींचे टीकास्त्र
या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन-तीन इंजिन लागून पण राज्याचे आरोग्य व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाही पण महाराष्ट्राचे काय? दुर्दैव असे की सरकारमधील तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःचे आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचे आरोग्य कसे सुधारेल याकडे अधिक लक्ष द्यावे, असे त्यांनी सुनावले आहे.