आम्हाला चोरी, भ्रष्टाचार, गुंडगिरी कराता येत नाहीत. दंगली घडवता येत नाहीत. पण आम्हाला शाळा आणि रुग्णालय बांधता येतात, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. ते नागपूरमध्ये एका खासगी वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलत होते.
देशात एक असा पक्ष आहे जो कुठेही दंगल घडो, त्यातील गुंडांना आणि लफंग्यांना पक्षामध्ये सामिल करुन घेतो. जर तुम्हाला दंगली हव्या असतील तर त्यांच्योसोबत जा, जर शाळा आणि रुग्णालय हवे असतील तर आमच्यासोबत या असे अरविंद केजरीवाल म्हणाले. लोकसभा निवडणूक जिंकणे हे आमचे लक्ष्य नाही, आमचे लक्ष्य हे देश आहे. आम्ही आमचे करिअर करण्यासाठी नाही तर करिअर सोडून आलो आहोत. भारत मातेसाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर देशाला वाचवण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. मी देवाकडे दोन गोष्टी मागतो. एक म्हणजे भारत नेहमी जगातील पहिल्या क्रमांकाचा देश राहो. दुसरे म्हणजे जोपर्यंत भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश बनत नाही तोपर्यंत मला मृत्यू मिळू नये. मला राजकारण नव्हे तर काम करता येते, असे दिल्लेचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.
महाराष्ट्रात सरकारी शाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. सुरुवातीला दिल्लीमध्ये शाळांची हीच स्थिती होती, आता ही स्थिती बदलली आहे. सरकारी शाळांचा बारावीतील निकाल हा 97 टक्के इतका आहे. सुमारे चार लाख विद्यार्थी खासगी शाळांमधून सरकारी शाळांमध्ये आले आहेत, अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली.