गतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अरविंद सुळे यांचे गुरूवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर जवाहर बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
( Arvind Sule founder of Vishwas Charitable Trust passed away )
सुळे हे युको बॅंकेत नोकरीला होते. ते स्वतः उत्तम चित्रकार होते. नखांच्या साहाय्याने चित्र रेखाटण्याच्या कलेत त्यांचा हातखंडा होता. ठाण्यातील कलावंतांच्या मित्र सहयोग संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी गतीमंद मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी विश्वास चॅरिटेबल ट्रस्टची 1990 मध्ये स्थापना केली. मात्र पत्नी अश्विनी यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पश्चात त्यांनी विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य निष्ठेने आणि तळमळीने पुढे सुरू ठेवले. विश्वास संस्थेतील मुलांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे काम त्यांनी सहकार्यांच्या मदतीने अव्याहतपणे केले. ते निर्गवी, प्रसिध्दीपरामुख आणि मितभाषी होते. लायन्स क्लबच्या सामाजिक कार्यकर्ते ते हिरीरिने सहभागी होते. त्यांच्या जाण्याने ठाणेकर एका सच्च्या, तळमळीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला मुकले असल्याची भावना व्यक्त होत आहे.
( हेही वाचा: डोंबिवलीतील मासळी मार्केटचा अखेर पुनर्विकास होणार )