एखाद्या राज्याच्या अर्थसंकल्पा एवढा मुंबई महापालिकेचा 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प आज सादर झाला.
वॉटर, गटर आणि “टेंडर” या पेक्षा मुंबईकरांसाठी एखादी लक्षवेधी ठरावी अशी संकल्पना, योजना याचा अभाव आणि कारभाऱ्यांना अर्थसंकल्पात अधिक “भाव” यापेक्षा काहीही वेगळे नाही, असं भाजपा आमदार आशिष शेलार म्हणाले.
मेट्रो, कोस्टल रोड, गारगाई धरण, यासारखे महत्त्वकांक्षी प्रकल्प मुंबईकरांसाठी आणणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कधी आभार मानले नाहीत, पण दरवर्षी मुंबईची तुंबई करणाऱ्या “कारभार्यांचा” आयुक्तांनी न चुकता जयजयकार केला, अशी खोचक टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
हा अर्थसंकल्प होता की अभिनंदनाचा ठराव?
500 चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ केला तसा मुळ मुंबईकर असलेल्या कोळीवाडे आणि गावठाणातील नागरिकांना काही देण्याची नियत दिसली नाही. कोविडमुळे अडचणीत आलेल्या मच्छीमार, रिक्षावाले, बलुतेदारांचा संवेदनशीलपणे विचार केला असेही नाही… टेंडर आणि बिल्डर मात्र जोरात. 11000 कोटीची बिल्डरांना केलेली प्रीमियम सवलतीची खैरात.. आणि मालमत्ता कराचे उत्पन्न कमी झाले…कोविड मुळे अर्थचक्राला आलेल्या मर्यादेमुळे उत्पन्नात घट झाली असे सांगितले जात असले तरी अर्थसंकल्पात 17.7% वाढ होऊन 45,949 कोटींनी कसा फुगला?आकडे तरी खरे, की तिथेही लपवाछपवी? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी महापालिका अर्थसंकल्पाचा समाचार घेतला आहे.
हेही वाचा : BMC Budget 2022 : मुंबई महानगरपालिकेला दिवाळखोरीकडे नेणारा अर्थसंकल्प, भालचंद्र शिरसाट यांची टीका