मुंबईत मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईतील रस्ते जलमय झाले आहेत. तर चेंबूर, विक्रोळी, भांडूपमध्ये संरक्षण भींती कोसळून मोठी जिवीतहानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाल्यांना पुर आल्यामुळे मुंबईकरांच्या घरात पाणी शिरले आहे. यावरु विरोधी पक्षनेत्यांनी महाविकास आघाडी आणि मुंबई महानगरपालिकेवर चांगलाच निशाणा साधला आहे. ही भविष्यातील मुंबईवर बेतलेल्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाहीत ना? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच मुंबईतील फ्लड गेटवरुन महापालिकेची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबईतील बदल आणि पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावेत अशी विनंती केली आहे. शेलार यांनी ट्विट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुंबईत यावेळी पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओहोटी असली तरी ओसरत नाही. भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी घुसले. गेली पंचवीस वर्षे लोकप्रतिनीधी म्हणून काम करताना असा अनुभव आला नव्हता, त्यामुळे भविष्यातील मुंबईवर बेतलेल्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
मुंबईत यावेळी पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओहोटी असली तरी ओसरत नाही.
भांडूपच्या जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे पाणी घुसले…
गेली पंचवीस वर्षं लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना असा अनुभव आला नव्हता, त्यामुळे भविष्यातील मुंबईवर बेतलेल्या मोठ्या संकटाचे हे संकेत तर नाही ना?
1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 19, 2021
मुंबईतील सध्याचे दिसणारे बदल हे फार धोकादायक आहेत. लोकांचा मृत्यू झाल्यावर नंतर हळहळ व्यक्त करण्यात काय अर्थ? यामुळे तातडीने महापालिकेसह लोकप्रतिनिधींची बैठक घ्यावी. या विषयातील तज्ज्ञांना बोलवावे आणि त्वरित आवश्यक असतील ते निर्णय घ्यावेत अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आशिष शेलार यांनी केली आहे.
फ्लड गेटची चौकशी व्हावी
मिठी नदीला फ्लड गेट लावण्यात येणार आहे. मुंबईत एकूण १८५ ठिकाणी हे फ्लड गेट लावण्यात येणार आहेत. मिठी नदीला फ्लड गेट लावणार तर मग वरळीचे फ्लड गेट का काढण्यात आले? ज्या ठिकाणी फ्लड गेट लावण्यात आले त्याचा काय फायदा झाला? मुंबई महानगरपालिकेचा हा नवा फ्लड गेट घोटाळा आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे संवेदनशील काम करत असतील परतु मुंबई महानगरपालिकेत काय चालले आहे. फ्लड गेट घोटाळ्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.