पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. या भेटीवरुन भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. रोजगार पळवण्यासाठी, महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्यासाठी आणि बरोबरीने बांगलादेशींवरच्या कारवाया थांबवण्यासाठी गुप्त बैठका चालू आहेत, असा आरोप शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.
अॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या भेटीबाबत गुप्तता का पाळण्यात आली असा सवाल करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. “विरोधकांचा नामोहरण करण्यासाठी गळे चिरणे याचे धडे गिरवले गेले आहेत का? याची माहिती महाराष्ट्राला पाहिजे आहे. कालपर्यंत भिवंडीमध्ये बांगलादेशी लोक पकडले जात होते. मग अशा पद्धतीने बांगलादेशींवरच्या कारवाया कुठे तरी थांबल्या पाहिजेत याची विनंती ममता बॅनर्जी यांनी युवा मंत्र्यांना केली नाही ना? उद्यापासून बांगलादेशींवरच्या कारवाया महाराष्ट्रात बंद, हे आश्वासन राजशिष्टाचार मंत्र्यांनी दिल्या नाहीत ना?” असा सवाल शेलार यांनी केला.
“नातं हे वरकरणी दाखवण्यासाठी आहे. कसलं नातं? कोणाचं नातं? बांगलादेशी समर्थकांशी तुमचं नातं काय? बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत करणाऱ्यांसोबत तुमचं नातं काय? या नात्याच्या गोष्टी महाराष्ट्राला मान्य नाहीत. रोजगार पळवण्यासाठी, महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्यासाठी आणि बरोबरीने बांगलादेशींवरच्या कारवाया थांबवण्यासाठी गुप्त बैठका चालू आहेत, असा आमचा आरोप आहे” असं शेलार म्हणाले.
“आम्हाला जय हिंदुराष्ट्र मान्य आहे, हे शिवसेनेला मान्य आहे का? हे ममताला मान्य आहे का? ममताला मान्य नसेल तर शिवसेनेची भूमिका काय? त्या नाऱ्यावर आधी बोला,” असं शेलार म्हणाले. “वाघीण म्हणून पाठराखण करत असाल तर आता त्रिपुराच्या पराभवानंतर रोझालीचा पण कार्यक्रम ठेवा. शिवसैनिक, ममताचे सैनिक, सगळे मिळून त्रिपुरात जो पराभव झाला त्याचा रडण्याचा रुझालीचा पण कार्यक्रम ठेवा. महाराष्ट्राला याच्याशी काय देणं घेणं आहे. तुम्ही ममताच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी काय मिळवलं हे सांगा. तुम्ही सत्ताधारी आहात, राजशिष्टाचार मंत्री आहात. गुप्त बैठकांना, कटकारस्थांना स्थान नाही. महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचं आहे. मुख्यमंत्री म्हणून ते भेटले असतील तर भूमिका स्पष्ट करावी,” असं शेलार म्हणाले.
“सिद्धीविनायकाच्या कोणी चरणी काय सांगावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे. केंद्रीय स्तरावर आमच्यासमोर ज्यांना यायचं आहे, त्यांचं कडू शमन लवकर होईल. आपआपसात आधी नेता कोण तो ठरवा,” असा टोला शेलार यांनी लगावला.
महाराष्ट्रातल्या आमच्या मुलांना वडापाव विकायला गाड्या देणार. इथले रोजगार ममता बॅनर्जींसोबत बंगालला पाठवणार, यावर भूमिका स्पष्ट करा, असं शेलार म्हणाले.