भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी निर्बंधांवरुन ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ठाकरे सरकार निर्बंधांचा धंदा करतंय, अशी टीका करत वाटाघाटी झाल्या की दारं उघडली जातात, असा आरोप आशिष शेलार यांनी केला. आशिष शेलार हे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ठाकरे सरकार हे निर्बंधाचा धंदा करतंय. जिथे वाटाघाटी होणार असतील, जिथे वाटा मिळाला तिथे निर्बंध शिथिल होतात. जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक होतात. रेस्टॉरंट्सवाले भेटले वाटाघाटी झाल्या अन् रेस्टॉरंट्स उघडी झाली असा आरोप आशिष शेलार यांनी केला. मराठी कलावंत, नाट्य कलावंत आंदोलन करताहेत, पण बंदी. पबवाले भेटले, वाटाघाटी झाल्या पब सुरू झाले. डिस्को, फाईव्ह स्टारवाल्यासोबत वाटाघाटी झाल्या त्यांनाही परवानगी. त्यामुळे निर्बंधांचा धंदा सरकारने बंद करावा, असं शेलार म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
सचिन वाझेचा प्रश्न सभागृहात मांडला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सचिन वाझे लादेन आहे का? असा सवाल केला होता. मग आता आम्हाला सांगा हे गोविंदा लादेन आहेत का? त्यांना अटक केली जात आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी दीड-दोन वर्षात महाराष्ट्र बंदीवान केल्याचा विक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे लिहिला जाईल, असं म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणतात आमचा सणांना नाही, तर कोरोनाला विरोध आहे. मग पब, बार इथे गर्दी होत नाही का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला. केंद्राचं पत्र दाखवता मग केंद्राच्या पत्रात पब, बार इथे गर्दी होत नसल्याचं म्हटलंय का? असा देखील सवाल शेलार यांनी केला.