अमरावती जिल्ह्यात जो हिंसाचार उफाळला त्यातील आरोपींना पाठीशी घालण्यात येत असल्याचा आरोप भाजप नेते अनिल बोंडे यांनी केला होता. या आरोपांवर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पलटवार केला आहे. दंगलीत आरोपी असणाऱ्या अनिल बोंडे यांनी शहाणपणा करु नये असं प्रत्युत्तर अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. अनिल बोंडे यांनी हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणी करत नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.
भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी अमरावती, मालेगाव, नांदेडमध्ये झालेल्या हिंसाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नांदेडमध्ये बोंडेंनी आंदोलानादरम्यान काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष आरोप केले होते. याला अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. दंगलखोरांना राजाश्रय दिला असल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे. यावर अशोक चव्हाण म्हणाले की, जे दंगलीत आरोपी आहेत. त्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये. बोडेंनी केलेले आरोपी हे हस्यास्पद आहेत. मानसिक संतुलन बिघडल्यासारखे ते बोलत असल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
अनिल बोडेंचे अशोक चव्हाणांवर आरोप
भाजप नेते अनिल बोंडे यांनी दंगलीतील आरोपींना राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप केला आहे. नांदेडमध्ये झालेली दंगल ही पुर्वनियोजीत होती. दंगलीतील आरोपींना राजाश्रय दिला जात आहे. यामुळे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली आहे. दंगलखोरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपने राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केले होते.
ठाण्यातही भाजपकडून निदर्शन
ठाण्यात आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वामध्ये धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. मालेगाव, अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारावर न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. राज्य सरकारचे तेरावे घालण्याची वेळ एसटी कर्मचाऱ्यांवर आली, हे दुर्देव आहे. महाविकास आघाडी सरकारने खुल्या मनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे.
हेही वाचा : शरद पवार, अनिल परब आणि अजित पवार यांच्यात चार तास खलबतं, ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा