मुंबईतील दोन लसीचे डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी सर्व मंत्र्यांची भावना असल्याचे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेटही कमी झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता लोकल प्रवास करण्यासाठी परवानगी नाही. परंतू कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस दिले आहेत. अशा नागरिकांना लोकल प्रवास आणि निर्बंधांतून सूट दिली पाहिजे. महाविकास आघाडीमधील सर्वच मंत्र्यांचेही असेच मत असल्याचे अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. तर ज्या नागिरकांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांना लोकल, बस, एसटी किंवा दुकान सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे असे माझं मत असल्याचे अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती आणि नागरिकांना सूट मिळण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता असल्याचे अस्लम शेख यांनी म्हटलं आहे. राज्यातील मॉल, दुकानं कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी जर लसीचे दोन डोस घेतले असतील अशा लसवंतांना मुभा देण्यासंदर्भात विचार करण्यात येणार असल्याची शक्यता अस्लम शेख यांनी वर्तवली आहे.
पूरग्रस्तांना मदत पॅकेज जाहीर करण्याची शक्यता
राज्यात अतिवृष्टीमुळे कोकण,पश्चिम महाराष्ट्रात दरड आणि पूरामुळे मोठं नुकसान झालं आहे. रायगड सातारामध्ये दरड कोसळून मोठी जिवितहानी झाली आहे. तर सांगली, कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थितीमुळे आतोनात नुकसान झालं आहे. पूरामुळे नुकसान झालेल्यांना राज्य सरकार मदत पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्तांच्या बाबतीत चर्चा होण्याची शक्यता आहे.