ईशान्य भारतातील आसाम आणि मिझोराम या राज्यांच्या सीमेवरून नागरिकांमध्ये काल जोरदार हिंसाचार पाहायला मिळाला. या हिंसाचारादरम्यान कर्तव्य बजावताना आसामचे ६ पोलीस जवान शहीद झाले, तर ५० पोलीस जखमी झाले. या जखमी पोलीस जवानांमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र SP वैभव निंबाळकर यांचाही समावेश आहे. वैभव हे मूळचे इंदापूर तालुक्यातील सणसरचे रहिवासी आहेत. पण सध्या ते कछार जिल्ह्याचे एसपी म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी घडलेल्या हिंसाचारामध्ये कर्तव्य बजावताना वैभव निंबाळकर यांच्या पायाला गोळी लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान वैभव निंबाळकर यांच्या आरोग्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील प्रार्थना केली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत ‘तब्येतीला लवकर आराम पडो ही सदिच्छा.लवकर बरे व्हा’ असं म्हटलं आहे.
आसाम राज्यातील कछार जिल्ह्याचे एसपी व मूळचे सणसर, ता. इंदापूर येथील वैभव चंद्रकांत निंबाळकर हे मिझोराम-आसाम सीमेवर झालेल्या गोळीबारात जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांच्या तब्येतीला लवकर आराम पडो ही सदिच्छा.लवकर बरे व्हा. @vaibhavips09 pic.twitter.com/v5YuIFLV3H
— Supriya Sule (@supriya_sule) July 27, 2021
आसाम आणि मिझोराम मध्ये सीमेवरून गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांमध्ये संघर्ष सुरु आहे. यात काल आसाम आणि मिझोरामच्या सीमा भागांत राहणाऱ्या ८ शेतकऱ्यांच्या झोपड्यांना आग लागल्याच्या कारणावरून हिंसाचार आणखी उफाळून आला. काही अज्ञात समाजकंटकांकडून ही आग लावण्यात आली. या आगीच्या कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून धुसफुसत असलेला सीमारेषेवरील वाद आणखी चिघळला.
यापार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्येकडील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शिलॉगमध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीला दोन दिवस होत नाही तोवर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. यावेळी दोन्ही राज्यातील नागरिक आपापसात भिडले. यावेळी दोन्हीकडून मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र जमावाला आवर घालताना अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले असून ६ पोलीस जवान धारातिर्थी पडले आहेत.