महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी राज्य सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्ष अनेक विषय घेऊन तयार आहे. राज्य सरकारकडूनही उत्तरे देण्याची तयारी झाली आहे. दरम्यान या अधिवेशनात सर्वात महत्त्वाचा आणि नागरिकांचे ज्या कायद्याकडे लक्ष आहे तो म्हणजे शक्ती कायदा आहे. शक्ती कायद्यावर अधिवेशनात चर्चा होणार असल्याची माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानभवानाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना शक्ती कायद्यावर अधिवेशनात चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. नीलम गोऱ्हे म्हणाले की, याच्यापूर्वी ज्या सगळ्या बैठका झाल्या त्यामध्ये विधेयके आणि काय काम करायचे याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा झाली आहे. शक्ती विधेयकासाठी आपल्याला कल्पना आहे. विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सदस्यांची संयुक्त चिकित्सा समिती नेमली होती त्यानुसार त्याचा मसुदा अंतिम करण्यात आला आहे. ज्या आमच्या अपेक्षा होत्या त्याचे प्रतिबिंब विधेयकामध्ये दिसेल.
लवकरात लवकर आरोपींना शिक्षा व्हावी आणि महिलांचे मदत व पुनर्वसन वेळेत व्हावे त्याबरोबर सायबर हल्ला आणि अॅसिड हल्ल्याचाही या विधेयकामध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्वांचे सहकार्य याला मिळून लवकर हे विधेयक मंजूर होईल अशी अपेक्षा आहे. तसेच केंद्र सरकारकडून लवकर परवानगी मिळावी अशी आमची अपेक्षा असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री एकदम बरे, योग्य वाटेल तेव्हा ते येतील : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे