एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणावरुन राज्य सरकारला सवाल केला आहे. हायकोर्टाने मुस्लिम समाज समाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकरित्या मागासलेला असल्याचे सांगितले आहे. मग मुस्लिमांना आरक्षण का दिले जात नाही. मुस्लिमांवर होणारा अन्याय कधी थांबणार? महाराष्ट्रातील मुस्लिमांनी आरणक्षासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे का? असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्रात मराठा आरक्षणावर चर्चा करता मग मुस्लिम आरक्षणाबाबत का चर्चा करण्यात येत नाही असे अनेक सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केले आहेत.
एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ओवैसी यांनी मुस्लिम आरक्षणावर भाष्य केलं आहे. ओवैसी म्हणाले की, मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कोणताही माणूस असो अन्याय संपण्याची गरज आहे. आमच्यासोबत अन्याय होत आहे. महाराष्ट्रातील त्या ५० जातींना मुंबई हायकोर्टाने आपल्या आदेशात सांगितले आहे की, शिक्षणात त्यांना ४ टक्के आरक्षण मिळू शकते कारण इम्पेरिकल अहवालानुसार मागास आहेत. त्यामुळे त्यांना आरक्षण न देणे हा अन्याय आहे. ज्यांना नाही द्यायचे त्यांना नका देऊ परंतु हायकोर्टाने आदेश दिला आहे तर मुस्लिमांना शैक्षणिक आरक्षण दिले पाहिजे असे ओवैसी यांनी म्हटलं आहे.
हा अन्याय संपला पाहिजे
तुम्ही मुस्लिमांना आरक्षण देत नाही मग तुम्ही आमच्यावर आरोप करता की कम्युनल, सेक्युलर आहेत. पण अन्याय तुम्ही करत आहात ते कुठेतरी संपले पाहिजे. महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण मिळाले पाहिजे सगळ्या मुस्लिमांना नाही तर जे ५० जाती आहेत. ज्यांना हायकोर्टाने आदेश दिला आहे. त्यांना दिले पाहिजे.
आम्ही रस्त्यावर येऊ का?
मराठा आरक्षणाला उशीर झाला नाही का आम्ही पण रस्त्यावर यायला पाहिजे का? तुम्ही फक्त मराठा आरक्षणाबाबत बोलता, दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाबाबत का बोलत नाही? कोण थांबवत आहे? सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत सांगितले होते की, मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही. हायकोर्टने सांगितले मागासलेला आहे. मग मराठ्यांना आरक्षण का नाही देत आहात? कायदा करुन राज्य सरकारला आदेश दिला आहे. तुम्ही देऊ शकता मुस्लिम लोकांना आरक्षण तर मग देत का नाही? द्या ना? असे ओवैसींनी म्हटलं आहे.
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांना ओवैसींनी प्रश्न विचारला आहे की, किती मुस्लिमांजवळ ५ एकरपेक्षा जास्त जमीन आहे. महाराष्ट्रातील जनतेला सांगा की, किती टक्के मुस्लिमांना बँकेतून आणि सहकारी संस्थेतून लोन दिला जातो, किती लोकं झोपडीत राहतात, किती मुस्लिम विद्यार्थी उच्च शिक्षित आहेत? जर उशीर झाला असेल तर लवकर मुद्दा मार्गी लावा असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : कोल्हापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी वकील राजकुमार राजहंस याला अटक