घरमहाराष्ट्ररत्नागिरीत आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला

रत्नागिरीत आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला

Subscribe

रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांवर तसेच त्यानंतर आलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना साखरीनाटे परिसरात घडली आहे.

रत्नागिरी येथील साखरीनाटे भागात सोमवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. पैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावातील आणखी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचे एक पथक रुग्णवाहिका घेऊन तिथे गेले होते; परंतु तेथे जमलेल्या लोकांनी त्यांना रोखले व रुग्णाला नेण्यास विरोध केला. त्यामुळे आरोग्य कर्मचार्‍यांनी पोलिसांची मदत घेतली.

- Advertisement -

घटनास्थळी पोलीस आल्यानंतरही जमावाने आपला विरोध कायम ठेवला व पोलिसांशीही हुज्जत घातली. त्यातून काही वेळातच हे प्रकरण चिघळत गेले आणि जमावाने कर्मचारी व पोलिसांवरही हल्ला केला. यावेळी शासकीय वाहनांवर दगडफेकही करण्यात आली. यामध्ये पोलिसांच्या गाडीच्या काचा तुटल्या आहेत. तसेच एका आरोग्य कर्मचार्‍यालाही दुखापत झाल्याचे कळत आहे. गावागावात कोरोना रुग्ण सापडत असल्याने चिंतेचे वातावरण असताना कोरोना योद्ध्याचे काम बजावणार्‍या यंत्रणेवरच हल्ले होत असल्याने आता चिंतेचे वातावरण बनले आहे.

रत्नागिरीत मंगळवारी प्राप्त अहवालांमध्ये ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३०९ झाली होती. दरम्यान १९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६८ झाली आहे. मंगळवारी जिल्हा कोविड रुग्णालय १, संगमेश्वर २, कोविड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली येथे १५ आणि कामथे येथे एक रुग्ण कोरोनामुक्त झाला. तर साखरीनाटे (राजापूर) येथील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ४२ झाली आहे. सध्या जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४९९ आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -