नाशिक : राहुल गांधी यांना ज्या खटल्यात 2 वर्षाची शिक्षा झाली आहे. ती नरेंद्र मोदी यांची बदनामी असेल असं वाटत असेल तर, नरेंद्र मोदी यांनी खटला दाखल करायला हवा होता. चौथी पार्टी येते खटला दाखल करते, सुरत न्यायालय यावर निर्णय देते हा काय प्रकार? कशासाठी चालले हे सगळं? असा सवाल राऊत यांनी उपस्थित करत विरोधकांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टिका खासदार संजय राऊत यांनी केली.
मालेगाव येथील सभेच्या तयारीच्या पार्श्वभुमीवर नाशिक दौर्यावर आलेले खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले कि, आजच्या यंत्रणा फक्त जे सत्ताधार्यांचे राजकीय विरोधक आहे, त्यांच्या चूका शोधून काढतात, आणि नसलेल्या चुकांना मोठे स्वरूप देऊन कारवाया केल्या जातात. दबाव आणतात, पक्ष फोडतात, सरकार पाडतात. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होतो. हे लपून राहिलेले नाही. नरेंद्र मोदी म्हणतात अमृतकाळ सूरु आहे. हाच त्यांचा अमृत काळ असून सूड आणि बदलाचे राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेबाबत बोलतांना ते म्हणाले, मनसेच्या इशार्यानंतर राज्यात मजारींना टार्गेट केले जात आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील सत्ताधार्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यांना महाराष्ट्रातील वातावरण बिघडवायचे आहे. दंगली घडवायच्या आणि मग निवडणुकांना सामोरे जायचे अशी पडद्यामागची पटकथा लिहिली जात आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीला जो पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे भाजप आणि त्यांचे बगलबच्चे हादरलेले आहेत. आमच्याशी सामना करता येत नाही म्हणून त्यांना जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवायच्या आहेत. पुन्हा एकदा राज्यात आणि देशात भितीचे वातावरण निर्माण करून निवडणुकीला सामोरे जायचे असे कारस्थान दिसत आहे. ही पडद्यामागची पटकथा दिसली आहे. त्यामुळे या पटकथेला जनमानसात स्थान मिळणार नाही, असे राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनाही फटकारले. शिवसेनेला स्क्रिप्टेड करण्याची गरज नाही. जसे त्यांच्या नेत्याचे होते तसे आहे का? आम्हाला बाहेरून सलीम जावेद लागत नाहीत. आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने विचार काम करतो. आमचा पक्ष स्वत:च्या पायावर उभा आहे. दुसर्याचे डोके आम्हाला लागत नाही, असा टोला त्यांनी संदीप देशपांडे यांना लगावला.