एमपीएससी निर्णयाचे श्रेय भाजपने लाटू नये; अतुल लोंढे यांचा खोचक सल्ला

अखेर विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले आणि त्यांनी हा निर्णय घेतला. पण या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना पुढे करून निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन करायला लावले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे फुकटचे श्रेय घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न भाजपने केला असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.

मुंबईः  एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भाजपने याचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा खोचक सल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपला दिला आहे.

अतुल लोंढे म्हणाले की, नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२५ या वर्षापासून करावी अशी राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची मागणी होती. गेल्या काही महिन्यांत विद्यार्थ्यांनी या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलनेही केली होती. काँग्रेस पक्षाने विद्यार्थ्यांच्या या मागणीला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा लावून धरत यासंदर्भात सरकारला विनंती केली होती. शिंदे-फडणवीस सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेत निर्णय घेण्याचे टाळले होते.

त्यानंतर १३ जानेवारी रोजी काँग्रेस पक्षातर्फे पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांसह संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी आंदोलन करण्यात आले. पुण्याच्या अलका टॉकीज चौकात हजारो विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत आंदोलन केले होते. त्यादिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही पुणे शहरात होते पण त्यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची साधी भेटही घेतली नाही. त्यानंतरही राज्यभरात विद्यार्थी आक्रमक होऊन आंदोलन करत होते.

अखेर विद्यार्थ्यांच्या एकजुटीपुढे सरकारला झुकावे लागले आणि त्यांनी हा निर्णय घेतला. पण या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना पुढे करून निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन करायला लावले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे फुकटचे श्रेय घेण्याचा अश्लाघ्य प्रयत्न भाजपने केला असा टोला अतुल लोंढे यांनी लगावला.

एमपीएससीचा नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. या निर्णयाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला लिहिले आहे. त्यामुळे आता एमपीएससीलाही तसा निर्णय जाहिर करावा लागणार आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.