वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबई, पुणे आणि औरंगाबादसह ईडीने सात ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. तसेच याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेत ईडीने आज (गुरूवार) छापासत्र सुरू केले असून काही उद्योजक आणि बिल्डरला टार्गेट करण्यात आलं आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सासऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पद्माकर मुळे हे विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये ईडीने उद्योजक पद्माकर मुळेंच्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. तसेच शहरातील जुन्या मनमंदिर कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या उद्योजक आणि बिल्डरांच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली आहे.
पद्माकर मुळेंच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी
औरंगाबादमध्ये ईडीने केलेल्या कारवाईंमध्ये विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांचीही समावेश आहे. मुळेंच्या कार्यालयावर सुद्धा छापेमारी करण्यात आली आहे. त्याचसोबतच बिल्डर जुगलकिशोर तापडिया यांच्याही कार्यालयावर छापेमारी करण्यात आली आहे. निराला बाजार या भागातील त्यांच्या बंगल्यांवरही छापे टाकण्यात आले आहेत. ईडीच्या ५४ अधिकाऱ्यांची टीम औरंगाबादेत दाखल झाली आहे. ईडीने बेनामी संपत्ती आणि मनी लॉंड्रिंगच्या आधारावर हे छापासत्र सुरू केल्याची माहिती आहे.
कोण आहेत उद्योजक पद्माकर मुळे?
पद्माकर मुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कुटुंबियांशी घनिष्ठ संबंध आहेत. औरंगाबादमध्ये अजित सीड्स नावाने पद्माकर मुळे यांची कंपनी आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे विश्वस्थ असून त्यांच्या नावावर साखर कारखानादेखील असल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा: गुजरातमध्ये वऱ्हाडी मंडळींनी भरलेल्या बसला भीषण अपघात, १५ जण जखमी
पुण्यातील ईडीच्या छापेमारीवर मलिकांचं स्पष्टीकरण
पुण्यातील ईडीच्या छापेमारीवर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वक्फ बोर्डाच्या सात ठिकाणांवर ईडीने छापेमारी केल्याची माहिती समोर आली होती. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर ईडीने छापे मारले नाहीत. असं स्पष्टीकरण नवाब मलिक यांनी दिलं आहे. तसेच वक्फ बोर्डाचं काम पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.