बरीच वर्ष प्रतिक्षेत असलेल्या चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी सोमवारी संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष खासदार गिरीश बापट डीजिसीआयचे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे. चिपी विमानतळ सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असताना या विमानतळाची प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र अद्यापही या विमानतळाचा संलग्न रोड झालेला नाही. तसेच विमानतळासाठी पुरेशी विद्युत जोडणी देखील झालेले नाही. विमानतळाला पाणी पुरवठा करण्याचे काम देखील अपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हे विमानतळ सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. परंतु या विमानतळाच्या अन्य कामांसोबतच धावपट्टी ची दुरुस्ती देखील बाकी आहे. त्यामुळे डीजीसीआयने विमानतळावरून विमान उड्डाण करायला अद्यापही परवानगी दिलेली नाही.
काम अपूर्ण असूनही विमान उड्डाण करण्यासाठी अलायन्स एअरलाइन ही कंपनी पुढे आली आहे. या कंपनीचा तिकीट काउंटर देखील विमानतळावर सुरू झाला आहे. अन्य काही कंपन्या या विमानतळावरून हवाई वाहतूक करायला इच्छुक असल्याचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. तर विमानतळ सुरू करण्यासंदर्भात नेहमीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी नेहमीच रंगलेल्या असतात
दरम्यान आज जिल्ह्यात खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने विमानतळाची पाहणी करतानाच विमानतळ बांधकाम कंपनी आयआरबीचे अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. डीजिसीआय चे संचालक खासदार राजीव प्रताप रूढी, खासदार विनायक राऊत खासदार जुगल किशोर शर्मा, खासदार सुदर्शन भगत यांचा समावेश आहे. ही समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार असल्याचे समजते .त्यामुळे प्रत्यक्ष विमान उडताना पाहण्यासाठी जिल्हा वासियांना अजून तरी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.