काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मनसे आणि शिवसेनेकडून यापूर्वीच अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. मनसेचा दौरा ८ जूनला होणार आहे. तर शिवसेनेचे नेते अदित्य ठाकरे यांचा १० जूनला अय़ोध्या दौरा होणार आहे. तर आता नाना पटोले यांनासुद्धा अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिलं आहे. नाना पटोले यांनी निमंत्रण स्वीकारले असून अयोध्या दौरा करणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत अयोध्ये भेटीच्या निमंत्रणाबद्दल माहिती दिली आहे. नाना पटोले यांनी ट्विट करत सांगितले की, अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज टिळक भवन, दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले. अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे भेट देऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला भेट देण्याचे निमंत्रण दिले. नाना पटोले यांनी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.
यावेळी त्यांनी मला अयोध्येला भेट देऊन प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याचे निमंत्रण दिले. याप्रसंगी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत त्यांचे आभार व्यक्त केले. pic.twitter.com/Eje1zFOecc
— Nana Patole (@NANA_PATOLE) May 9, 2022
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन वादंग
मनसेने २००८ पासून महाराष्ट्रातील उत्तर भारतीय, फेरीवाले, यूपी बिहारच्या लोकांवर अन्याय केला आहे. त्यांना मारहाण केली आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी अन्यथा अयोध्या दौऱ्यावर येऊ देणार नाही असे ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये पाय ठेवू देणार नाही. राज ठाकरे मिलिट्री घेऊन आले तरी त्यांना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही. आमच्या मृतदेहावरून राज यांना जावं लागेल असा थेट इशारा ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे.
शिवसेनेचे अयोध्या दौरा
शिवसेनेचाही अयोध्या दौरा होणार आहे. १० जून रोजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असणार आहे. अयोध्येत दौऱ्यापूर्वी तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच अयोध्येत दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.