विधान परिषदेच्या सहा जागांवर झालेल्या निवडणुकीत चार जागांवर महाविकास आघाडी सरकारने विजय मिळवत भाजपचा धुव्वा उडवला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला केवळ धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था या एकाच जागेवर विजय मिळवता आला. दरम्यान, महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपाला धूर चारली आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते आणि भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. याच दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.
This bad beginning will surely lead to a good ending ! #JaiMaharashtra @BJP4Maharashtra
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) December 4, 2020
महाविकास आघाडीला लोकांचा पाठिंबा – शरद पवार
धुळे-नंदुरबारचा विजय वगळता विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपला मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीने या निवडणुकीत चांगले काम केले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘धुळे आणि नंदुरबारचा निकाल आश्चर्यकारक नाही. कारण त्या ठिकाणचे उमेदवार हे विद्यमान आमदार होते. त्यांनी पक्षांतर केल्यामुळे राजीनामा दिला आणि पुन्हा निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांचा विजय खरा विजय म्हणता येणार नाही. पण, बाकीच्या ठिकाणचा निकाल हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाला मतदारांनी दिलेली पावती आहे’, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांना एकही जागा नाही
विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या अपयशावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला, चांगल्या जागांची अपेक्षा होती. पण, एकच जागा मिळाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांना एकही जागा नाही, असे म्हणत शिवसेनेला टोला लगावला आहे.
हेही वाचा – औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक