घरमहाराष्ट्रही तर मुख्यमंत्र्यांची दादागिरी

ही तर मुख्यमंत्र्यांची दादागिरी

Subscribe

साम, दाम, दंड भेदाविरोधात तक्रार

पालघरमधील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेतील वाद विकोपाला गेला असताना उघड झालेल्या ऑडिओ क्लिपमधील साम, दाम, दंड, भेदामागील मुख्यमंत्र्यांची नेमकी कूटनिती कोणती, असा प्रश्न काँग्रेसने विचारला आहे. अशी दादागिरी करणारी कूटनिती लोकशाहीस धोकादायक आहे. तसेच या कूटनितीचा मुख्यमंत्र्यांनी कुठे आणि कसा वापर केला, कुठे दाम दिला, कुठे दंड केला आणि कसा भेद केला, याचीही चौकशी करा आणि कारवाई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक निर्णय अधिकाèयांकडे केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याची ही कूटनिती त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिप संदर्भात काँग्रेससह बहुपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाèयांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर लायन्स क्लब हॉल येथे पत्रकारपरिषदेत बोलताना सावंत यांनी मुख्यमंत्र्यांवर शाब्दीक हल्ला चढवला. ऑडिओ क्लिपमधील मुख्यमंत्र्यांची भाषा ही आश्चर्यकारक, धक्कादायक आणि लोकशाहीला घातक आहे.
यामध्ये साम, दाम, दंड, भेद असे शब्द वापरत असताना मुख्यमंत्र्यांकडून किती लोकांना दाम दिला? किती लोकांना दंडित केले? व कुठले भेद केले? याची विचारणा निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ क्लिपच्या पेन ड्राईव्ह तक्रारीसह निवडणूक
अधिकाऱ्यांना देऊन केली. मुख्यमंत्र्यांच्या संभाषणातून राज्याला दादागिरी करणारा मुख्यमंत्री लाभला आहे आणि त्यांचे लोकशाहीबाबतचे विचार किती उच्च आहेत, हे राज्यातील जनतेला कळाले ते बरे झाले, असा टोला सावंत यांनी लगावला.
साम, दाम, दंड, भेद ही भाषा कोणत्या पारदर्शक शब्दकोषातून कूटनितीशी जोडली जाऊ शकते आणि कूटनिती लोकशाहीमध्ये केव्हापासून मान्य झाली याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले पाहिजे.

- Advertisement -

भाजपचे बेकायदा फलक, पैशांचा गैरवापर?
या निवडणुकीमध्ये भाजपकडून सत्ता आणि पैशाचा प्रचंड गैरवापर सुरू असून अनधिकृत होर्डिंग भाजपचेच आहेत. मतदारांना पैसे वाटप करताना भाजपच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. त्यामुळे हे सर्व प्रकार मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने झाले असावेत, असा निष्कर्ष मुख्यमंत्र्यांच्या संभाषणातून निघतो. काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, या मागणीवर ठाम आहे असे सावंत म्हणाले.

मुख्यमंत्री सातत्याने आचारसंहितेचा भंग करत आहेत, हे दुर्दैवी आहे. या अगोदरही अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी सराईतपणे आचारसंहितेचा भंग केला. काँग्रेस पक्ष वारंवार याबाबत निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रारी दाखल करत आहे. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी स्वतः आचारसंहितेचे पालन करून राज्यातल्या जनतेपुढे आदर्श ठेवणे अभिप्रेत आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणात जनतेला आमिष दाखवून आचारसंहितेचा भंग केला अशी तक्रार काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावर अद्यापही समाधानकारक कारवाई झाली नाही. त्यामुळे निवडणूक आयोग सत्तेच्या दबावाखाली काम करत आहे का ? अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे. असे सावंत म्हणाले.
भाजपच्या सत्ताकाळात मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली लोकशाही धोक्यात आली आहे अशी चिंता ज्यांना वाटत असेल त्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहन काँग्रेस पक्षाने केले होते. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन विकास आघाडीने काँग्रेससोबत येऊन मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -