घरमहाराष्ट्रकोरोना मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांपैकी राज्याने १ लाख देण्याची हमी द्यावी; थोरातांचं...

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना चार लाखांपैकी राज्याने १ लाख देण्याची हमी द्यावी; थोरातांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

कोरोनाच्या संकटाला संपूर्ण देश सामोरे गेले. कोरोनामुळे अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना गमवावं लागलं. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना चार लाख मदत देणार असं आश्वासन दिलं होतं. परंतु आता केंद्र सरकार त्यांच्या आश्वासनावरुन माघार घेत राज्य सरकारवर जबाबदारी टाकत आहे. त्यामुळे आता आमचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने चार लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे. महाराष्ट्राने यातील आपला २५ टक्के हिस्सा अदा करण्याची हमी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यघटनेने आपल्या नागरिकांना शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक सेवांचा मूलभूत अधिकार दिलेला आहे. यासोबतच आपली राज्यघटना प्रत्येक नागरिकाला राज्याकडून त्यांचे घटनात्मक अधिकार प्राप्त करून घेण्याचाही अधिकार देते.

- Advertisement -

कोविड-१९ महामारीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान राज्य सरकारच्या राज्य आपत्ति मदत निधी मधून दिले जावे असे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने ११ सप्टेंबर २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयात दिले होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) अंतर्गत ही रक्कम केंद्र व राज्य सरकार ७५ टक्के आणि २५ टक्के अशी दिली जाते.

- Advertisement -

कोविड-१९ महामारीची लागण देशभरात मोठ्या प्रमाणात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे आर्थिक गणित पूर्ण बिघडले. अनेकांची आयुष्यभराची कमाई या महामारीने संपुवून टाकली व असंख्य कुटुंब कर्जबाजारी झाली आहेत. अशा परिस्थितीत केवळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे. प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत करणे सरकारला शक्य नाही असे केंद्र सरकार म्हणते. पण केंद्र सरकार पेट्रोलियम पदार्थांवरील करातून लाखो करोडो रुपयांची कमाई करते आणि बड्या उद्योगपतींना कार्पोरेट टॅक्समध्ये भरघोस सवलत देते, कोविड पीडितांना मदत द्यायची म्हटले की निधीची अडचण पुढे करते, हे पटत नाही.

केंद्र सरकारने कोविड-१९ ला NDMA अंतर्गत आपत्ती जाहीर करुन कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लादले. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून भरभक्कम दंड वसूल करण्यात आले. परंतु NDMA अंतर्गत सहाय्य निकषामध्ये ४ लाख रुपये मदतीचे प्रावधान असताना त्याची पूर्तता मात्र केली जात नाही.

एक कल्याणकारी राज्य म्हणून गरजेच्या वेळी आपल्या नागरिकांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने १४ मार्च २०२० रोजी (33-4/2020-NDM-1) अधिसूचित केलेल्या पूर्वीच्या आदेशानुसार कोविड-१९ मृतांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये देण्याच्या केंद्र सरकारच्या वचनाची पूर्तता करावी ही आमची मागणी आहे .

SDRF निकषांनुसार ४ लाखांपैकी ७५ टक्के, जे ३ लाख केंद्र सरकारने भरावे आणि उर्वरित २५ टक्के, म्हणजे १ लाख, राज्य सरकारचा हिस्सा आहे. आम्ही विनंती करतो की आपण राज्य सरकारांच्या १ लाख सानुग्रह रकमेचा हिस्सा अदा करण्याची हमी द्यावी म्हणजे केंद्र सरकारवर दबाव येऊन ते बाधित नागरिकांबद्दलची त्यांची वचनबद्धता पूर्ण करण्यास प्रवृत्त होईल. याद्वारे आपण आपल्या नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा त्यांचा हक्क देण्यात यशस्वी होऊ.

महोदय, आम्‍ही आपल्या सकारात्मक उत्तराच्या प्रतिक्षेत आहोत, असं बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -