नाशिक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सावरण्यासाठी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील माजी नगरसेवक आणि पदाधिकार्यांशी संवाद साधत जे सोडून गेले त्यांचा विचार सोडा. आता आपली कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी रविवारी (दि.24) मातोश्रीवर एकत्र येत आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे दाखवून दिले. यावेळी कोअर कमिटीच्या प्रमुख सदस्यांसह ३२ माजी नगरसेवक तसेच मालेगाव, इगतपुरी, सिन्नर, मनमाड या ठिकाणच्या पदाधिकार्यांचा समावेश होता. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, माजी आमदार वसंत गिते, ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, प्रथमेश गिते, माजी आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, निवृत्ती जाधव, संतोष गायकवाड, भागवत आरोटे, मधूकर जाधव, हर्षदा गायकर, नयना गांगुर्डे यांसह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
शिवसेना आमची आहे, असा दावा शिंदे व त्यांच्या समर्थकांकडून केला जात असून पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. ही बाब लक्षात घेत उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये बैठकांचा धडाका लावला आहे. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे हे निष्ठा यात्रेनिमित्त महाराष्ट्र दौर्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर टाळण्यासाठी २०१७ ते २०२२ या पंचवार्षिक काळामध्ये निवडून आलेले व सद्यस्थितीमध्ये माजी ठरलेल्या ३३ नगरसेवकांनी रविवारी (दि.२४) मातोश्री येथे उव ठाकरे यांची भेट घेतली.
त्यांना काय मिळाले ?
नाशिकमधील पदाधिकार्यांशी संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्या बंडखोरीवर भाष्य केले. गोडसे यांना काय दिले नाही, एकदा नव्हे दोनदा तिकीट दिले असे सांगत, जाऊ द्या जे गेले त्यांना सोडून द्या. आपण पक्ष संघटना पुन्हा उभी करू, असे त्यांनी सांगितले.