बीड : राज्य सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा 9 दिवस आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी 9 नोव्हेंबर रोजी उपोषण मागे घेतलं आहे. परंतु मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी गालबोट लागले होते. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर या दोन नेत्यांच्या घरासह माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीलादेखील आग लावत कथित मराठा बांधवांनी हिंसक आंदोलन केले होते. याप्रकरणी पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी बीड पोलिसांनी आणखी 400 जणांची ओळख पटवली असून आतापर्यंत 181 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. (Beed burning Arrest of alleged Maratha brother by police during Diwali 181 people arson in Diwali jail)
हेही वाचा – मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणग्या जमा करण्यात ठाकरे, फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे पिछाडीवर
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी 25 ऑक्टोबरपासून मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले होते. मात्र मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चालल्यामुळे बीडमधील आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी 30 व 31 ऑक्टोबर रोजी शहरात जाळपोळ केली. आंदोलकांनी राष्ट्रवादी भवन, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, बीआरएसचे दिलीप गोरे यांची कार्यालये पेटवून दिली. तसेच माजलगाव येथील नगरपालिकेसह आमदार प्रकाश सोळुंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राहत्या घरालाही आग लावण्यात आली होती.
ऐन दिवाळीतही पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरूच
गेल्या अनेक वर्षांपासून शांततेत चाललेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला काही दिवसांपूर्वी बीडमध्ये गालबोट लागले. अचानक सुरु झालेल्या जाळपोळीत बीड शहर आणि माजलगावमध्ये जवळपास 11 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी पोलिसांकडून 307 अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेत घटनेचे व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांची ओळख पटवली. ज्यात आतापर्यंत 400 पेक्षा अधिक लोकांची ओळल पटली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी आतापर्यंत 181 पेक्षा अधिक लोकांना अटक करून जेलमध्ये तर काहींना कारागृहात पाठवले आहे. ऐन दिवाळीतही पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरूच आहे. त्यामुळे आरोपींना दिवाळी जेलमध्ये साजरी करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा – शरद पवारांच्या व्हायरल जात प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “10वीला असताना…”
जाळपोळ करणारे कोणत्या समाजाचे आहे हे आमच्यासाठी महत्वाचे नाही
दरम्यान, बीज जाळपोळ प्रकरणी मनोज जरांगे यांनी इशारा दिल्यानंतर बीड पोलिसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांनी म्हटले की, बीड जाळपोळ प्रकरणी हल्लेखोरांची ओळख पटवूनचं प्रत्येक आरोपीला ताब्यात घेतले जात आहे. जाळपोळ करण्याची ओळख व्हिडिओ आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून केली जात आहे. त्यानंतर अटकेची कारवाई होत आहे. त्यामुळे जाळपोळ करणारे कोणत्या समाजाचे आहे हे आमच्यासाठी महत्वाचे नाही. आमच्यासाठी फक्त आरोपी हा आरोपीच आहे, अशी भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे.