मुंबई – पावसाळी अधिवेशात आजचा सहावा आणि शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानपरिषदेमध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र या प्रस्तावात देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे नाव नसल्यामुळे या प्रस्तावावर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
विधानपरिषदेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी हा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडल्यानंतर कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी या प्रस्तावात पंडीत जवारलाल नेहरू यांचे नाव नाही, असे सांगत या प्रत्सावाला विरोध केला. “तुम्ही मांडत असलेला प्रस्ताव मी ऐकला, त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख नाही. ते व्यक्ती सामर्थ्य नव्हे, ते शक्ती सामर्थ्य होतं”, असे भाई जगताप यांनी म्हटले. तसेच, या देशांमध्ये जेव्हा 70 वर्षांमध्ये काँग्रेसने काय केले असे विचारले जाते, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान कोणी नाकारू शकतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवाय, मला आश्चर्य वाटते आणि माझी विनंती की ते प्रस्तावातही आले पाहिजे, अशी मागणी जगताप यांनी केली.