राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केली. आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फुट पडली असून, शिवसेनेच्या नेत्यांकडून शिंदे गटातील आमदारांवर हल्लाबोल केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना गद्दार असे बोलले होते. त्यावेळी शिंदेंच्या गटातील आमदारांनीही ठाकरेंच्या टीकेला प्रत्यत्तर दिले होते. एकनाथ शिंदे यांनी बंडावेळी राष्ट्रवादी सोबतची आघाडी तोडा असे उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. मात्र, त्यांना शरद पवार जवळचे वाटत असल्याचा आरोप शिंदे गटने केला होता. शरद पवारांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप त्यांनी केला होता. अशातच आता शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुठे लिंबू फिरवले’, असे वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bharat gogavale slams ncp chief sharad pawar)
रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुठे लिंबू फिरवले आणि कुठल्या भक्ताकडे गेले माहीत नाही. भाजपासोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेससोबत युती करत राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते”, असे गोगावले यांनी म्हटले.
शिवाय, “शिवसेनेने भाजपासोबत युती केली असती तर आम्ही पाच पावले मागे आलो असतो”, असेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना दुजाभाव मिळत असल्याबाबतच्या तक्रारी अनेकदा गोगावले यांनी ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही तक्ररीच दखल न घेतली गेल्यामुळे अखेर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत युती केली असल्याचेही गोगावले यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. शनिवारी मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाच्या ६२व्या वर्धापनदिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. राज्यात महागाई आहे, पण बेकारी वाढत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पण महाराष्ट्रातलं सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करुन घेतले जात आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकरी बेहाल झाला आहे. तिथे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं ना खातेवाटप म्हणजे सगळे मंत्री आझाद आहेत, कोणावरही काहीही बंधनं नाहीत. आझादी का अमृत महोत्सव…मंत्र्यांचं आपलं चाललंय. पदं मिळाली आहेत, पण जबाबदारी नाही. करा मजा, मौज, मस्ती, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोला लगावला आहे.
हेही वाचा – सगळे मंत्री आझाद, पद मिळूनही जबाबदारी नाही; उद्धव ठाकरेंचा टोला