कोल्हापूर : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मागील वर्षी ‘भारत जोडो यात्रा’ करत जनसामान्यांपर्यंत पोहोचत विरोधकांना आणि विशेषतः काँग्रेस पक्षाला एक नवी उभारी दिली. त्यांच्या या यात्रेचा दुसरा टप्पा आता लवकरच सुरू होणार आहे. यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्ष बांधणीचे काम करण्यात येईल. याबाबत आज पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भारत जोडो यात्रेचे कौतुक केले. (‘Bharat Jodo Yatra’ improved opposition’s position, Sharad Pawar praises Rahul Gandhi)
हेही वाचा – Sharad Pawar : आमदार म्हणजे पक्ष नव्हे, शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राहुल गांधींचा जो पहिला दौरा झाला. त्यामुळे विरोधकांची स्थिती सुधारली. दुसऱ्या दौऱ्यातूनही स्थिती सुधारेल असे वाटते. लोकांना संघटीत करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. त्यांचा दौरा हा विरोधकांसाठी चांगला आहे. तसेच, बसपा नेत्या मायावती इंडिया आघाडीत का नाही? याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता, याबाबत बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. मायावती स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. इतरांसोबत निवडणूक लढण्याची त्यांची मनस्थिती नाही. इतरांसोबत निवडणूक लढण्याची मनस्थिती नसेल तर आम्ही त्यांना काही जबरदस्ती करू शकत नाही. त्यांनी जर न येण्याची भूमिकाच स्वीकारली असेल तर प्रश्न येतो कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही राष्ट्रीय पातळीवर पाहतो. आंध्र आणि तेलंगनासोबत येत नाही. त्यांची भूमिका वेगळी आहे. ते येत नसतील तर त्यांना काही करू शकत नाही, असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी इंग्रजी वृत्तपत्राला सांगताना म्हटले आहे की, विरोधकांच्या आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले तर आम्ही नक्कीच जाऊ, असे वक्तव्य आंबेडकरांनी केले. याबाबत शरद पवार यांना आज वितारले असता ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घ्यायचे की नाही हा विषय चर्चेतच आलेला नाही. विषय चर्चेत आल्यानंतर त्या संबंधी विचार केला जाईल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये सहभागी होतील की नाही, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
तर, जागा वाटपाबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. जिथे त्यांची शक्ती नसेल तिथे आग्रह धरू नये असे मत मांडले गेले. तिथे अंतिम निर्णय होईल. तो निर्णय झाल्यावर जागा वाटपाची बैठक होईल. ती बैठक 1 तारखेनंतर होईल. मग कोल्हापूरची जागा असो की चंद्रपूरची सर्वांवर निर्णय घेतला जाईल, असे सांगत शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात मला चेंज दिसतो. दोन गोष्टीबाबत लोकांच्या मनात नाराजी आहे. एक भाजप आणि दुसरे म्हणजे भाजपला पाठिंबा देणारे. ज्यांनी भाजपला पाठिंबा दिला त्या घटकांबाबत नाराजी आहे. तरुण पिढी आणि ज्येष्ठांमध्ये ही नाराजी प्रकर्षाने दिसून येत आहे.