Central Railway Disrupted | मुंबई – मध्य रेल्वे मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी तांत्रिक बिघाड झाल्याने कसारा ते सीएसएमटीपर्यंतची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कसारा ते उंबरमाळी दरम्यान ट्रॅकमध्ये उद्भवलेल्या आपत्कालीन कामामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. सकाळी ६.३० वाजल्यापासून ही वाहतूक बंद होती. परंतु, आता ही वाहतूक धीम्या गतीने सुरू करण्यात आल्याची माहिती, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
अप लाईन कसारा – उंबरमाळी दरम्यान ट्रॅकमध्ये उद्भवलेल्या आपत्कालीन कामामुळे कसाराहून ठाणे , सीएसएमटी च्या दिशेने जाणारी वाहतूक बंद आहे. सकाळी 6.30 नंतर. Track Attention साठी स्टाफ / ऑफिसर्स काम करत असून लवकरच काम पूर्ण केले जाईल. महितीस्तव.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) March 9, 2023
मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर आज सकाळी तांत्रिक बिघाड झाला. कल्याणहून कसारा-कर्जत दिशेला असलेल्या स्थानकांवरून लोकलच्या फेऱ्या मर्यादित स्वरुपात आहेत. त्यामुळे सकाळपासूनच येथील लोकल तुडूंब भरून वाहत असतात. त्यातच, कसारा-उंबरमाळी दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी ६.३० वाजल्यापासून कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे ट्रॅक अटेंशनसाठी कर्मचाऱ्यांनी जलद वेगाने काम करून बिघाड दुरुस्त केला. सध्या ट्रॅकचे काम सुरू झाले असून बाधित भागापासून काही वेळ वेगमर्यादा कमी ठेवून लोकलसेवा सुरू करण्यात आली आहे.
ट्रॅकचे काम झाले असून affected section मध्ये काही वेळ वेगमर्यादा कमी ठेऊन आता गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) March 9, 2023
ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार उद्भवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. या मार्गावरून लोकल फेऱ्या मर्यादित स्वरुपात असल्याने येथील प्रवाशांना घड्याळ्याच्या काट्यानुसारत प्रवास करावा लागतो. एखादी लोकल सुटली की पुढची लोकल येण्यासाठी अर्धा-एक तास वाट पाहावी लागते. परिणामी कार्यालय गाठण्यास उशीर होतो. त्यामुळे घडाळ्याच्या काट्यावर चालणाऱ्या या प्रवाशांच्या मार्गात अशा पद्धतीने सातत्याने अडचणी निर्माण झाल्यास प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहे.