मुंबई : महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदांवरून बराच राजकीय गोंधळ झाला होता. महायुतीत तीन पक्ष असल्यामुळे पालकमंत्रिपदावरून बरीच ओढताण सुरू होती. रायगड आणि नाशिकबद्दल अजूनही ‘सस्पेन्स’ कायम आहे. यातच ज्या जिल्ह्यांचे पालमंत्रिपद मित्र पक्षांकडे आहे, अशा जिल्ह्यांवर भाजपने ‘वॉच’ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नसलेल्या तब्बल 15 जिल्ह्यांत भाजपचे मंत्री संपर्कमंत्री म्हणून काम करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातही भाजपचे संपर्कमंत्री नेमले आहेत. परंतु, सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी विशेष नेमणुका करण्यात आल्या आहेत, असं भाजपकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : संभाजीनगरमध्ये बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे किडनॅपिंग, अपहरणकर्ते फोन करून म्हणाले, ‘बच्चा चाहिए तो…’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपने मंत्री गणेश नाईक यांच्याकडे संपर्कमंत्रिपद दिले आहे. मुंबई शहर जिल्ह्यात मंगलप्रभार लोढा हे संपर्कमंत्री असतील. गणेश नाईक यांनी आधीच ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं घोषित केले होते. त्यातच ठाण्याचे संपर्कमंत्रिपद पुन्हा गणेश नाईक यांच्याकडे दिल्यानं चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद अजितदादा पवार यांच्याकडे आहे. तिथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे संपर्कमंत्रिपदाची जबाबदारी सोपावली आहे. त्यासह धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याऐवजी अजितदादांना बीडचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. तिथेही पंकजा मुंडेंना संपर्कमंत्री बनवण्यात आले आहे.
कुठे-कुठे संपर्कमंत्री?
गोंदिया पंकज भोयर, बुलडाणा आकाश फुंडकर, यवतमाळ अशोक उईके, वाशीम राधाकृष्ण विखे पाटील, छत्रपती संभाजीनगर अतुल सावे, बीड पंकजा मुंडे, धाराशिव जयकुमार गोरे, हिंगोली मेघना बोर्डीकर, जळगाव गिरीश महाजन, नंदुरबार जयकुमार रावल, मुंबई शहर मंगलप्रभात लोढा, ठाणे गणेश नाईक, रत्नागिरी आशिष शेलार, कोल्हापूर माधुरी मिसाळ आणि पुणे चंद्रकांत पाटील.
हेही वाचा : ‘उद्धव ठाकरेंशी संबंध खराब नाहीत, पण…’, युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितले