देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर. महाराष्ट्रात असलेल्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर आसाम सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारनं म्हटलं आहे. भीमाशंकरचं सहावं ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केला आहे. एवढंच नाही तर आसाम पर्यटन विभागानं संदर्भात जाहिरातबाजी देखील केली आहे. यावरून आता विरोधकांकडून टीका सत्र सुरू झालंय. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं देखील नाव आलंय. सुप्रिया सुळेंनी केलेल्या ट्वीटला भाजपनं सडेतोड उत्तर दिलंय.
महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचा आसाम सरकारचा दावा आहे. यावरून सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत भाजपला टार्गेट केलं. “भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही ठेवायचं नाही असं ठरवलंय काय? अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याचे उद्योग आणि रोजगार पळविले आणि आता चक्क आमचा सांस्कृतिक व अध्यात्मिक वारसा पळविण्याचा घाट घातलाय….!” असं त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलंय.
सुप्रिया सुळे यांनी शेअर केलेल्या ट्विटला भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी तिखट सवाल उपस्थित करत सडेतोड उत्तर दिलंय. “ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत?” असा सवाल विचारण्यात आलाय. फक्त एव्हढंच बोलून ते थांबले नाहीत. “या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? महाविकासआघाडी सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले.” असंही केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.
ताई महाराष्ट्रातील सोसायट्या, कारखाने कुणी चाटून पुसून खाल्ले? परत विकत घेतले? किती राष्ट्रवादीचे नेते यांत सहभागी आहेत?
या सरकारमध्ये एक उद्योग गेला हे दाखवा? थोडी जबाबदारीची अपेक्षा ठेऊ शकतो ना महाराष्ट्र आपल्याकडून? #मविआ सरकार असतानाच महाराष्ट्रातील उद्योग गेले. https://t.co/ctTwQwkfzx— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 14, 2023
आसाममध्ये असलेले भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिसवा सरमा यांनी एका जाहिरातीमध्ये आसाममध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. पण या जाहिरातीमध्ये त्यांनी आसाम राज्यात असलेल्या डाकिनी टेकडीच्या कुशीत वसलेल्या पमोही गुवाहाटी येथील शिवलिंग हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिसवा यांनी केलेल्या या अजब दाव्यामुळे महाराष्ट्रातील नेते मंडळींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.