राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ही आत्महत्या नसून खून आहे, असा गंभीर आरोप केला होता. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीट देखील केलं होतं. मात्र, कंबोज यांच्या ट्वीटनंतर भाजप आमदार अमित साटम यांनी मनसुख हिरेन, वैभव कदमनंतर आता पुढे कोण? असं म्हणत सवाल उपस्थित केला आहे.
भाजप आमदार अमित साटम यांनी ट्वीट केलं आहे. मनसुख हिरेन, वैभव कदम यांच्यानंतर पुढे कोण? मी अंदाज लावू शकतो. प्रमुख खटल्यांतील सर्व साक्षीदार सुटले! कायद्यापेक्षा कोणी शक्तिशाली आहे का? कायदा आणि संविधान सर्वोच्च आहे, असं अमित साटम यांनी म्हटलं आहे.
Mansukh Hiran, Vaibhav kadam, who is next? I can predict. All witnesses in prominent cases cleared off way! Is anyone too powerful, above law. NO. Law and constitution is Supreme. https://t.co/etOeImX4vG
— Ameet Satam (@AmeetSatam) March 29, 2023
मोहित कंबोज यांचा आरोप काय?
मोहित कंजोब यांनी ट्विट करत एका व्हिडीओच्या माध्यमातून गंभीर आरोप केले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचा अंगरक्षक आणि मुंबई राखीव पोलीस दलातील कर्मचारी वैभव कदम याने आत्महत्या केली आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, या प्रकरणी तात्काळ तक्रार दाखल करण्यात यावी. जे पोलीस जनतेची सेवा करतात. जर तेच सुरक्षित नसतील किंवा त्यांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय?, असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.
वैभव कदम हे जितेंद्र आव्हाडांचे सुरक्षारक्षक होते. एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातल्या आरोपीचा असा संशयास्पद मृत्यू होतो. राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत सारखं प्रकरण झालंय, असा आरोप कंबोज यांनी केला आहे.
दरम्यान, मोहित कंबोज आणि अमित साटम यांनी केलेल्या ट्विटमुळे आणि कदम यांच्या शेवटच्या स्टेटसमुळे वैभव कदम यांनी खरच आत्महत्या केली की, काही कारणामुळे सत्य बाहेर येऊ नये म्हणून हत्या करण्यात आली असा संशय निर्माण होत आहे.
हेही वाचा : आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या नव्हे तर… मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप