राज्यातील भाजप नेते सध्या दिल्ली दरबारी आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ रविवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, निरंजन डावखरेही दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना भेटीचं कारण सांगितलं.
लोकसभेत आज १२७ वं घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार होतं. या विधेयकाला याच अधिवेशनात मान्यता मिळावी यासाठी अमित शहांना भेटून विनंती केली. त्यांची पण तयारी आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी विरोधक कामकाज होऊ देत नसल्याचा आरोप करत या विधेयाकाकरिता तरी कामकाज होऊ द्यावं, अशी मागणी देखील फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी ५० टक्क्यांच्या मर्यादेवर देखील भाष्य केलं. विरोधकांनी ५० टक्क्यांच्या मर्यादेचं नव्याने शोधलेलं कारण आहे. इंदिरा सहानी खटल्यातील निर्णय अतिशय स्पष्ट आहे. यातील गंभीर मुद्दा टक्केवारी नाहीच आहे. महत्त्वाचा मुद्दा मागास घोषित होणं हे आहे. तुम्ही एखाद्या समाजाला मागस घोषित केल्यानंतर किती टक्के आरक्षण द्यायचं हा नंतरचा भाग आहे. अजून तुम्ही मागास घोषित करत नाहीत. केंद्राकडे अधिकार आहेत म्हणून मागास घोषित केलं नाही. आता राज्यांना अधिकार दिले आहेत, आता कार्यवाही करा, असं फडणवीस म्हणाले.
एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार हे राज्यांनाच असावे,अशा प्रकारची मागणी आम्ही केली होती.
आज त्यासंदर्भातील विधेयक संसदेत येते आहे. हे विधेयक लवकर मंजूर व्हावे,अशी मागणी देशाचे गृहमंत्री,आमचे नेते मा. अमितभाई शाह यांना भेटून केली.@AmitShah#LokSabha #MonsoonSession #Delhi pic.twitter.com/1ZUsKADQST— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 9, 2021