महाविकास आघाडीमध्ये कोणाची कोणाला गॅरंटी राहिलेली नाही, असा टोला भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या गंभीर आरोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपांची सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केलेली नाही. तर न्यायालयाने या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारमधील कोणालाच कोणाची गॅरंटी राहिलेली नाही. त्यांच्यामध्ये एवढा अविश्वास तयार झालाय की, कोणीच कोणावर विश्वास ठेवायला तयार नाही, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. कोणाला कसा मार बसतोय, कोण कोणाचे नाक दाबतंय, कोण कसे फरफटत चाललंय, कोण कोणाचे तोंड दाबतंय आणि कोण कोणाचा गळा दाबततंय, ते रोज आपण बघतोय, असं देखील पाटील म्हणाले. एखादा ऑन ड्युटी असलेला पोलीस कमिश्नर जेव्हा पत्र लिहून एवढे गंभीर आरोप करतो, तेव्हा या सरकारने या गोष्टीचं गांभीर्य ओळखायला हवं होतं. आता मात्र या सरकारवरचा विश्वास कमी झआलेला आहे, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील सध्या पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांचा प्रचार करत आहेत.
सध्या राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या हिट विकेट पडत आहेत. त्यामुळे त्यासाठी कोणी गुगलीही टाकायची वेळ आलेली नाही. आता ओपनिंग बॅट्समनच्या विकेट पडल्यात तशा हळूहळू बाकीच्याही जाणारच आहेत, असा जोरदार टोला हर्षवर्धन पाटील यांनी लगावला. पोटनिवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचार सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार प्रशांत परिचारक आणि भाजप पदाधिकारी उपस्थित होते.