ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्याशिवाय राज्यातील महापालिकेंच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. यासाठी त्या संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची देखील घोषणा केली आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतिदिन आहे. यानिमित्त पंकजा मुंडे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.
पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षणावर भूमिका स्पष्ट केली. ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला. तसंच आमच्या जागाच गेल्याने आम्ही वंचित राहणार असू तर निवडणुका कशासाठी घ्यायच्या? आरक्षण नसेल तर वंचित घटक मुख्य प्रवाहात कसा येणार? असे प्रश्न पंकजा मुंडे यांनी उपस्थित केले. तसच पुढे बोलताना या निवडणुका धनदांडग्यांच्या बनून राहतील. आरक्षण नसेल तर न्यायप्रक्रियेमुळे निवडणुका होणारच नाहीत. त्यामुळे पुढील निवडणुका होण्याआधीच ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय घ्या, अशी मागणीही पंकजा मुंडे यांनी केली.
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी राज्य सरकार मराठा आरक्षण देण्यात कमी पडला, असा आरोप केला. गेल्या वर्षभरात मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला ट्विटरवर, फेसबुकवर मेसेज करत आहेत की, गोपीनाथ मुंडेंनी भगवानगडावरून आम्हाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आज ते असते तर मराठा तरूणाला आरक्षणासाठी असं दारोदार फिरायची वेळ आली नसती, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.