काँग्रेसकडून वारंवार आगामी निवडणूकीत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा दिली जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यभरातील सभा बैठकीत नेहमीच काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे म्हटलं आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावरुन महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरली होती. यावरुन विरोधकांनी टीका केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. बळ-बळ करणाऱ्यांना जनता पळ काढल्याशिवास राहणार नाही अशी खोचक टीका दरेकरांनी काँग्रेसवर दिला आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यावर महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याचे उघड झालं आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट करत काँग्रेस आणि सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना पक्षाच्या स्वबळाची पडली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारची ताकद राहिली नाही. त्यांच्या बाहुत बळ राहिले नाही. राज्यातील कामगार देशोधडीला लागला असून त्याच्याही हातात बळ राहिले नाही. अशा वेळेला स्वबळाचे पडले आहे. परंतु सत्ताधारी अशाचप्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसले तर बळ-बळ म्हणताना जनता पळ काढल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालणारे महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष स्वबळाची भाषा करतायत,परंतु जनता त्यांना ‘पळ’ काढायला लावल्याशिवाय शांत बसणार नाही! pic.twitter.com/D6SACuVtFP
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 14, 2021
सत्ताधाऱ्यांना आपलं सरकार कसं टिकेल याची चिंता आहे. एकमेकांना वाईट बोलतातही आणि नांदतातही म्हणजे सकाळी वाईट बोलायचे आणि संध्याकाळी पुन्हा भेटायचं एवढच सुरु आहे. यांना लाज-शरम काहीच वाटत नाही. स्वबळाचं तुम्ही काय करायचे आहे ते करा परंतु जनतेचा छळ झालाय यामुळे सामान्य जनतेच्या हातात बळ राहिले नाही. यामुळे आता राज्यातील जनता तुम्हाला पळ काढल्याशिवाय राहणार नाही अशा शेलक्या शब्दात दरेकरांनी राज्य सरकार आणि काँग्रेसवर टीका केली आहे.