राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. मात्र, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींना (Sambhaji Raje Chhatrapati) उमेदवारी देण्यात आलेली नाही. तसेच आज देखील संभाजीराजे छत्रपतींनी मुंबई पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Chief Minister Uddhav Thackeray) टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला. उद्धव ठाकरेंकडून मला ही अपेक्षा नव्हती, अशी नाराजी संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली. दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली आहे.
अतुल भातखळकर ट्विट करत म्हणाले की, संभाजीराजे छत्रपतींच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतो हे उघड झाले. आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं, म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले आहेत, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.
संभाजी राजे छत्रपतीच्या निमित्ताने चार भिंतीच्या आड खोटं कोण बोलतो हे उघड झाले.
आपल्याला अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचं वचन दिलं होतं म्हणून अमित शहांना खोटे पाडणारे, आज पुरते उघडे पडले आहेत.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 27, 2022
राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याने मी मोकळा झालो आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही. माझ्यासाठी खासदारकी महत्त्वाची नसून जनता माझ्यासाठी महत्त्वाची आहे. स्वाभिमानाने आणि सन्मानाने राहणारं माझं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे मी कोणासमोर झुकणार नाही. मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य संघटना पुढे कार्यरत ठेवणार आहे. स्वराज्य संघटना मजबूत करणार आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, विधानसभेच्या २८८ सदस्यांमधून राज्यसभेत निवडून द्यायच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होत आहे. तर राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हेही वाचा : Aryan Khan Drugs Case : आर्यन खानच्या क्लीनचीटवर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया