Maharashtra Assembly Budget Session : मुंबई : राज्यात अनेक दिवसांपासून भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचा प्रकार समोर येत असून पुण्यातून अन्न आणि औषध विभागाने 1400 किलो पनीर जप्त करत कारवाईही केली होती. या घटनेचे पडसाद आता विधानसभेतही उमटताना दिसत आहेत. यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी बनावट पनीर घेतच विधिमंडळात प्रवेश केला. आपल्यासमोर आणले गेलेले 70-75 % पनीर कृत्रिम असल्याचे सांगत आज लक्षवेधीत अन्न आणि औषध प्रशासनासमोर त्यांनी हा प्रश्न मांडला. (bjp mla vikramsingh pachpute aggressive on fake paneer issue questions in lakshavedhi)
काही महिन्यांपासून राज्यामध्ये भेसळयुक्त पनीरची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. हाच मुद्दा भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी आज लक्षवेधीत मांडला. राज्यात बनावट अन्नपदार्थांवरून अनेकदा चिंता व्यक्त होताना दिसते. कारवायाही होतात मात्र, कारवाई म्हणून केवळ गुन्हा दाखल करण्यापलीकडे काहीच होत नाही. अन्न व औषध प्रशासनात अधिकारी वर्ग नसल्याने मोठी छापेमारी एफडीए करू शकत नसल्याचं आमदार विक्रमसिंह पाचपुते म्हणाले. खरे तर सिंथेटिक पनीर विक्रीला परवानगी नाही.
हेही वाचा – POP Ganesh Idol : पीओपीच्या मूर्तींचा नियम शिथिल होणार? विधानसभेत पंकजा मुंडे म्हणाल्या –
यासाठी पाचपुते यांनी अध्यक्षांना द्यायला पनीर आणले. 70-75 टक्के पनीर आर्टिफिशिअल असल्याचे मला तज्ज्ञांनी सांगितले. तुम्ही ओळखून दाखवा कोणते पनीर खरं आहे. दुर्दैवानं टेस्टिंग करण्याची सोय नाही .आयोडिनची टेस्ट स्टार्च शोधण्यासाठी आहे.
केंद्र सरकारचा चीज बनवण्यासाठीचा एक कायदा आहे. आपण याबाबत जनजागृती करणे गरजेचे नाही. आपल्या रोजच्या जेवनातले 70 ते 75% टक्के पनीर हे कृत्रीम आहे. ते दुधापासून बनवलेले नाही. हे पनीर फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅक्ट टाकून बनवले आहे. एकाबाजूला पनीर तर दुसरीकडे पनीर सारखे दिसणारे ऍनॉलॉग चीज आहे, असे आमदार पाचपुते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे बनावट पनीरही दिले. आपल्या लहान मुलांना आपण अन्न म्हणून पनीरच्या नावाखाली विष खाऊ घालत आहे, हे तेलाचे गोळे आहेत, असे म्हणत विक्रमसिंह पाचपुते यांनी संताप व्यक्त केला. मी प्रश्न मांडला तर कारवाई करण्यात आली. पुणे तसेच चंद्रपूरमध्ये तब्बल 15 लाखांचे पनीर सापडले. ही बाब गंभीर आहे. याविरोधात कोणताही कठोर कायदा नाही. हा माझ्या एकट्याच्या मतदारसंघाचा प्रश्न नाही, तुम्ही पनीर खाऊन पाहा.. अशा शब्दात विक्रमसिंह पाचपुते यांनी आक्रमक भूमिका घेतली.
अधिकारी वर्ग नाही त्यामुळे मोठी छापेमारी एफडीए करु शकत नाही. यासाठी कायद्यात तरतूद करावी लागणार आहे. भेसळयुक्त पनीर दिलं तर ब्रॅंडिंग संदर्भात गुन्हा दाखल होऊ शकतो. यात बाकी काहीही होऊ शकत नाही. हा जीवाचा प्रश्न आहे गांभीर्याने विषय घ्यावा लागणार आहे, असेही पाचपुते म्हणाले.