स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यात त्यांना एक डायरी सापडली असून, या डायरीत यशवंत जाधन यांचे अनेक व्यवहार उघडकीस आले आहेत. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला २ कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आली आहे. दरम्यान हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा यशवंत जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला आहे. यानतंर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केलं आहे.
“हद्द कर दी”
यशवंत जाधव नी घोटाळा लपविण्यासाठी, वांद्रा मातोश्री ला वाचविण्यासाठी
स्वतःचा “आई” चे नाव द्यावे…. वाईट वाटते
५० लाखाचे घड्याळ, ₹२ कोटी रोख
जाधवांनी पोच पावती, बिल ही घेतले असेल !!??
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 28, 2022
”हद्द कर दी…यशवंत जाधवांनी घोटाळा लपवण्यासाठी, वांद्रा मातोश्रीला वाचविण्यासाठी स्वतःच्या “आई”चे नाव द्यावे….वाईट वाटते. ५० लाखाचे घड्याळ, २ कोटी रोख…जाधवांनी पोचपावती, बिलही घेतले असेल !!??” असं ट्वीट किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. तसंच, यशवंत जाधव यांच्या ‘मातोश्री’ भेटीची अंमलबजावणी संचालया मार्फत (ईडी) चौकशी करण्याची मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. चौकशीतून कोणी सुटू शकणार नाही. आता खूप काही घडणार आहे, असे सूचक वक्तव्य पाटील यांनी केले आहे.
”या डायरीत कोणत्या ‘मातोश्री’ची नोंद आहे, हे मला माहीत नाही. पण आता चौकशीतून कोणीही सुटू शकत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले, तरी केंद्रीय तपास यंत्रणा स्वायत्त आहेत”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत मुंबईत आंदोलन
”हा उल्लेख आपल्या आईबाबतचा असल्याचा खुलासा जाधव यांनी प्राप्तिकर विभागाकडे केला असला तरी जाधव हे शिवसेनेचे नेते असल्याने त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावे. हा उल्लेख ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाबत आहे की अन्य कोणाविषयी आहे, हा आर्थिक अफरातफरीचा (मनी लाँडिरग) प्रकार असून त्याची ईडीने चौकशी करावी”, अशी मागणी भातखळकर यांनी केली आहे. तसंच, शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबाबत पुढील आठवड्यापासून मुंबईत आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायलयात ५ याचिकांची सुनावणी
‘ह्या आठवड्यात ठाकरे ससकारच्या घोटाळेबाजांच्या विरोधात न्यायलयात ५ याचिकांची सुनावणी’, असंही ट्वीट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
ह्या आठवड्यात ठाकरे सरकार चा घोटाळेबाजांचा
विरोधात न्यायालयात ५ याचिकेची सुनावणीHearing of 5 petitions this week at Mumbai & Pune Courts, against Ghotalebaj of Thackeray Sarkar @BJP4India @BJP4Maharashtra pic.twitter.com/l9wLqUXumI
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 28, 2022
कोरोना संकटाच्या नावाखाली महापालिकेची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू
मुख्यमंत्री भाषण चांगले देतात. पण कोरोना संकटाच्या नावाखाली महापालिकेची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू असल्याचे आम्ही आधीपासून सांगत होतो. हे आता प्राप्तिकर विभागाच्या कारवायांवरून सिद्ध होत आहे. मुंबई महापालिकेत झालेला भ्रष्टाचार हळूहळू बाहेर येईल. त्यामुळे यावर मी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला.
महापालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटलं जात
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी महापालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटले जात आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले की, शंभर टक्के महापालिकेच्या माध्यमातून मुंबईकरांना लुटले जात आहे.महापालिकेत कोविड सेंटर घोटाळा झाला. कोविड सेंटर उभारणी, साहित्य खरेदी, मनुष्य पुरवठा करण्यात घोटाळा. अर्ज नाही, टेंडर नाही. केवळ पदाधिकारी असल्याने ३८ कोटीचे काम देण्यात आले.
हेही वाचा – दादर परिसरात ड्रेनेजमध्ये अडकली गाय; बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न