मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतांसाठी तुष्टीकरण.. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि परिवारवाद… या विरोधात भाजपाने एल्गार पुकारला असून मुंबईत “जागर मुंबईचा” हे अभियान सुरु करण्यात येत आहे. उद्या वांद्रे येथून या जागराला सुरुवात होणार आहे.
मुंबईची शांतता धोक्यात आणून मुंबई महापालिका निवडणूकीसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. एका विशिष्ट वर्गाचे तुष्टीकरण केले जात आहे,असा आरोप करीत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली “जागर मुंबईचा” हे अभियान घोषित केले आहे. याची सुरुवात उद्या दि. 6 नोव्हेंबर पासून होते आहे. या जागर यात्रेचे प्रमुख आमदार अतुल भातकळकर असून हे अभिमान राजकीय भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
उद्या वांद्रे पूर्व येथे गव्हर्नमेंट काँलनीतील पी.डब्ल्यू.डी मैदानात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. खासदार पुनम महाजन आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार हे प्रमुख वक्ते म्हणून या सभेत संबोधित करणार आहेत. आमदार अँड पराग अळवणी यांच्यासह मुंबईचे पदाधिकारी यावेळी उपस्थितीत राहणार आहेत.
त्यानंतर 7 नोव्हेंबरला गोंदिवली अंधेरी पूर्व येथे सभा होणार असून विशेष म्हणजे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी लागताच दुसऱ्याच दिवशी याच मतदार संघात भाजपाने सभा ठेवली आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतांसाठी तुष्टीकरण.. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि परिवारवाद तसेच औरंगजेबी स्वप्न पाहणाऱ्यांची जी भलती “उठा”ठेव सुरु आहे त्या विरोधात भाजपाचे मुंबईकरांसाठी झंझावाती जागर… सुरू होत असून या मुंबईच्या जागराला वांद्रे पूर्व येथूच सुरुवात होणार, मुंबईचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मुंबईकरांनी या अभियानात सहभागी व्हावे हे मुंबईकरांचे जागर आहे, असे आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.