“राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे किमान मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवा राहणारचं, लोकांच्या आशीर्वादावर शिवसेनेची सत्ता येणारच” असा विश्वास मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महानरपालिकेची मुदत आज संपणार आहे. निवडणुक न झाल्याने आणि मुदत संपल्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमावा लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या की, “शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून कामगिरी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, आघाडी सरकार म्हणून काही निर्णय घेऊन पुढे चालले आहेत. जे आमच्या समोर येईल त्या समोर आलेल्या संधीला आम्ही संकट म्हणणार नाही. त्याचं सोनं करू, मुंबईकर निश्चित शिवसेनेसोबत आहेत. कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ज्या पद्धतीने काम करत आहेत. त्यामुळे किमान मुंबईमध्ये शिवसेनेचा भगवा राहणारचं, लोकांच्या आशीर्वादावर सत्ता येणारच. शिवसेनेचाच महापौर असणार आहे. असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.
“तपास यंत्रणांच्या धाडी पडणार होत्या, पडल्या ते भाजपात गेल्यावर साधू झाले”
केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाड सत्रावर बोलताना महापौर म्हणाल्या की, ज्या पद्धतीने ईडीच्या धाडी पडत आहेत, ते दुनियेला सगळ्यांना कळून चुकले आहेत. ज्यांच्यावर तपास यंत्रणांच्या धाडी पडणार होत्या, पडल्या ते भाजपमध्ये गेल्यावर साधू झाले, शुद्ध झाले. पर्याय असा आहे की, एकतर आमच्यात या किंवा हे घ्या. सैनिक आहोत. यशवंत जाधव हे शिवसैनिक आहेत भीम पूत्र आहेत लढतील आणि जे काही आहे ते आपल्यासमोर येईल. ही कायद्याची आणि कागदाची लढाई आहे. कायदा आणि कागद जेवढा मजबूत त्यांच्याकडे असणार तर ते करणारचं असही महापौर म्हणाल्या.