घरमहाराष्ट्रथॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना महापालिका देणार गुणवत्तापूर्ण उपचार

थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांना महापालिका देणार गुणवत्तापूर्ण उपचार

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि इको इंडिया (एक्स्टेंशन फॉर कम्युनिटी हेल्थकेअर आऊटकम) यांच्या संयुक्त विद्यमानाने थॅलेसेमिया नियंत्रण आणि हेमोग्लोबिनोपॅथी नियंत्रणासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या क्षमतावाढ प्रशिक्षण, कौशल्य विकास मोहीमेला नुकतीच सुरुवात झाली आहे. रक्ताशी संबंधित दुर्मीळ आजाराने ग्रस्त रुग्णांची योग्य काळजी घेता यावी, यासह व्यापक जनजागृतीसाठी राष्ट्रीय पातळीवर हा पुढाकार घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचे बोरिवली स्थित थॅलेसेमिया उपचार केंद्र हे या मोहीमेसाठी माहिती केंद्र म्हणून कार्यरत आहे.

आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी वर्गाची क्षमता, ज्ञान, कौशल्य विकास वाढीसाठी हाती घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण मोहीमेमुळे मुंबईतील थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांची काळजी अधिक चांगल्या रितीने घेणे शक्य होणार आहे. त्यासोबतच रूग्णांना प्राथमिक टप्प्यातच योग्य उपचार मिळतानाच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होईल. थॅलेसेमिया तसेच रक्ताशी संबंधित दुर्मीळ आजारांनी ग्रस्त रूग्णांना देण्यात येणाऱ्या सुविधांमधील पोकळी भरुन काढण्यासाठी ही मोहीम उपयुक्त असेल, असे मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे
यांनी सांगितले.

- Advertisement -

सदर मोहीमेसाठी इको इंडिया यांनी संयुक्त सहभाग घेतला असून शीव रूग्णालयाचे दूरस्थ (सॅटेलाईट) केंद्र असलेली प्रादेशिक प्रशिक्षण संस्था (बोरिवली) ही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे महापालिकेच्या सायन रूग्णालयाचे (शीव) अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेचे कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसेमिया केअर, पेडिएट्रिक हेमॅटोलॉजी ऑन्कॉलॉजी एण्ड बोन मॅरो ट्रान्सप्लांट केंद्र (बोरिवली) च्या संचालक (शैक्षणिक आणि संशोधन) डॉ.ममता मंगलानी म्हणाल्या की, मुंबईतील थॅलेसेमिया रूग्णांच्या नियमित तपासणीचे महत्व जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. तसेच, हेमिओग्लोबिनोपॅथीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यादिशेने इको इंडियासोबतची भागीदारी ही रक्ताशी संबंधित दुर्मीळ आजारांनी ग्रस्त रूग्णांसाठी उपचार उपलब्धततेकरिता महत्वाचे पाऊल आहे.

- Advertisement -

यंदाच्या आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा पुढाकार अतिशय महत्वपूर्ण आहे. थॅलेसेमियाबााबत योग्य शिक्षणाने जनजागृती करा, जागरूक रहा, व्यक्त व्हा आणि काळजी घ्या, हेच यंदाच्या संकल्पनेचे उदिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंडियन अकॅडमी ऑफ पेडिएट्रिक्सचे अध्यक्ष डॉ. उपेंद्र किंजवडेकर म्हणाले की, अनुवांशिक रक्ताचे आजाराने ग्रस्त रूग्णांना उपचार देण्यासाठी आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण, योग्य ज्ञान आणि आवश्यक कौशल्याच्या प्रशिक्षणामुळे रूग्णांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच या उपक्रमाला एक वेगळी संधी म्हणून पाहणे गरजेचे आहे.

मुंबई महापालिकेसोबत इको इंडियाची भागीदारी ही प्रशिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने थॅलेसेमिया आणि हेमोग्लोबिनोपॅथीज संसर्ग प्रतिबंध, नियंत्रण आणि रूग्णांना प्रतिकारक क्षमता वाढीसाठी चालना देणार आहे, असे इको इंडियाचे सहउपाध्यक्ष डॉ. संदीप भल्ला यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -