घरताज्या घडामोडीमिठी नदीत सोडण्यात येणाऱ्या रासायनिक आणि सांडपाणी अडविण्याच्या प्रक्रियेवर पालिकेचा मोठा निर्णय

मिठी नदीत सोडण्यात येणाऱ्या रासायनिक आणि सांडपाणी अडविण्याच्या प्रक्रियेवर पालिकेचा मोठा निर्णय

Subscribe

२६ जुलै २००५ रोजी मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊन मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. तेव्हापासून मुंबई महापालिकेने मिठी नदीच्या विकासाचे काम हाती घेतले. आतापर्यंत १ हजार १५० कोटी रुपये खर्चल्यानंतर आजही मिठी नदीत सांडपाणी, रासायनिक पाणी सोडले जात आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ता अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आता पालिकेने मिठी नदीत सोडण्यात येणारे रासायनिक व सांडपाणी अडविण्याचा व त्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे अनिल गलगली यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पालिकेने कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यापूर्वीच मिठी नदीतील सांडपाणी व रसायनमिश्रित पाणी रोखण्यासाठी आवश्यक प्रयत्न का केले नाहीत, असा सवाल उपस्थित करीत नाराजी व्यक्त केली आहे. जर पालिकेने त्याचवेळी मिठी नदीत प्रदूषण निर्माण करणारे सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी रोखले असते तर आज मिठी नदी प्रदूषण मुक्त झाली असती, असा दावाही त्यांनी केला आहे.

- Advertisement -

मिठी नदीतील प्रदूषण रोखण्यात पालिकेला आलेल्या अपयशाबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पालिका पर्जन्य जल वाहिनी विभागाचे उप प्रमुख अभियंता विभाष आचरेकर यांनी, मिठी नदीतील प्रदुषण नियंत्रित करण्यासाठी सल्लागार मे. फ्रिशमन प्रभू यांनी सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत काही कामे सुचविली असल्याचे अनिल गलगली यांना कळविले.

सदर, सल्लागाराने सुचविलेल्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत, गट क्र.१ अंतर्गत, फिल्टरपाडा, पवई ते डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड दरम्यान नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी अडवून ते मिठी किना-यालगत नियोजित मलनिःसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेऊन डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड येथे प्रस्तावित ८ द.ल.घ.ली. एवढया क्षमतेच्या मलशुध्दीकरण केंद्रामध्ये प्रक्रीया करण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असून माहे मे २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी कळविले आहे.

- Advertisement -

तसेच, सल्लागाराने सुचविलेल्या दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत गट क्र.२ अंतर्गत, मुख्यतः (भरती प्रवण क्षेत्र वगळता) छोटया नाल्यामधून मिठी नदी मध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे ई. कामांचा अंतर्भाव आहे. सदर कामे प्रगतीपथावर असून डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

त्याचप्रमाणे, गट क्र.३ अंतर्गत भरती प्रवण क्षेत्रातील मिठी नदी व वाकोला नदीत विविध पातमुखांद्वारे उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदी व वाकोला नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे, फ्लड गेट बांधणे, उदंचन पंप बांधणे, प्रामनेड बांधणे इत्यादी कामांचा अंतर्भाव आहे. सदर कामाची निविदा प्रकिया प्रगतीपथावर आहे.

तसेच, गट क्र.४ अंतर्गत मुख्यतः मरोळ-बापट नाला व सफेद पूल नाला या दोन पातमुखांद्वारे मिठी नदी मध्ये उत्सर्जीत होणारे सांडपाणी अडवून ते धारावी स्थित सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यंत बोगदयाद्वारे वळविण्याचे काम अंतर्भूत आहे. सदर काम प्रगतीपथावर असून ते २०२५ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मिठी नदीतील प्रदूषणाबाबत साकीनाका येथील लाठिया रबर रोड वरील रेडिमिक्स कंपनीवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेच्या ‘एल’ वार्ड कार्यालयाला कळविण्यात आले आहे.


हेही वाचा : ट्रम्प आणि न्यूयॉर्क पोस्ट ब्लॉक करणाऱ्या विजया गड्डेंवर एलॉन मस्कचा हल्लाबोल, कोण आहे ही महिला?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -