अग्निवीर ही योजना लष्कराची नाही असं भारत जोडो यात्रेदरम्यान लष्करी अधिकारी आणि माजी सैनिकांनं सांगितलं होतं. ही आरआरएसची आयडिया आहे. जी अजित डोवाल यांनी लष्करावर, तरुणांवर लादली आहे, असा गंभीर आरोप आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर केला आहे. आज संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभेत आभार प्रस्तावावर चर्चा सुरु होती. यावेळी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, गरिबी आणि अदानी ग्रुप या मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.
अग्निवीरनंतर समाजात हिंसाचार आणखी वाढेल
यावर राहुल गांधी म्हणाले की, आता तुम्ही अग्निवीर योजनेचे कौतुक केले, पण लष्करी भरतीसाठी पहाटे चार वाजता रस्त्यावर धावणाऱ्या बेरोजगार तरुणांना ही योजना मान्य नाही. चार वर्षांनंतर आम्हाला सैन्यातून बाहेर काढले जाईल, असं मत हे तरुण व्यक्त करत आहेत. लष्करातील निवृत्त अधिकारी म्हणतात की, अग्निवीर योजना लष्कराची नाही. ही योजना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आली आहे, जी आता लष्करावर लादण्यात आली आहे. अजित डोवाल यांनी ही योजना तरुणांवर लादली. समाजात आधीच बेरोजगारी वाढतेय, आता अग्निवीरनंतर समाजात हिंसाचार आणखी वाढेल, असे अनेक गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केले आहेत.
यावेळी राहुल गांधी यांनी अजित डोवाल यांचे नाव घेतल्याने सत्ताधारी पक्षाने आक्षेप घेत तुम्ही त्यांचे नाव घेऊ शकत नाही, असं सांगितलं. ज्यावर राहुल गांधी आणि काँग्रेस सदस्यांनी का घेऊ शकत नाही असा प्रतिप्रश्न केला. ज्यावर राहुल गांधी म्हणाले की, भाषणात महागाई आणि बेरोजगारीचा उल्लेख नाही. अग्निवीर योजनेचीही एका ओळीत चर्चा केली आहे.
LIVE: Shri @RahulGandhi‘s reply to the Hon’ble President’s address in Lok Sabha.https://t.co/o3IzP4RFD4
— Balasaheb Thorat (@bb_thorat) February 7, 2023
अदानीच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेराव
राहुल गांधी म्हणाले, मला यात्रेदरम्यान तमिळनाडू, केरळपासून हिमाचलपर्यंत प्रत्येक राज्यात एकचं नाव ऐकू आले ते म्हणजे, अदानी, अदानी, अदानी… यावेळी प्रत्येक तरुण एकच विचारत होता की, आम्हालाही अदानींसारखं स्टार्टअप सुरु करायचं आहे? कारण अदानी ज्या व्यवसायात हात घालतात त्यात ते यशस्वी होतातच. यापूर्वी अदानी जगातील श्रीमंतांमध्ये 609 व्या क्रमांकावर होते, पण अशी काय जादू घडली की, नऊ वर्षांत ते दुसऱ्या क्रमांकावर पोहचले, असा प्रश्नही राहुल गांधींनी केला. यावेळी काँग्रेस खासदारांनी सभागृहात मोदी है तो मुमकिन है अशी घोषणाबाजी केली.
अदानी यांचे पंतप्रधान मोदींशी नेमके काय संबंध आहेत?
आज रस्त्याने चालत जा आणि विचारा हा रस्ता कोणी बांधला, यावर अदानी हे एकचं नाव पुढे येईल. हिमाचलमधील सफरचंद अदानींचे आहेत. अदानी यांचे पंतप्रधान मोदींशी नेमके काय संबंध आहेत, हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असही राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधींनी सभागृहात मोदींचे काही जुने फोटो दाखवले. ज्यावर सत्ताधारी खासदारांनी गदारोळ घातला. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुला गांधीना रोखलं आणि अशी पोस्टरबाजी करुन नका म्हटलं. यावर अदानी 2014 मध्ये 609 व्या क्रमांकावरून इतक्या कमी वेळात दुसऱ्या क्रमांकावर तेव्हा पोहोचले जेव्हा मोदीजी दिल्लीत आले, त्यानंतर खरी जादू सुरू झाली, असा गंभीर आरोपही राहुल गांधींनी केला आहे.