सोलापूर येथे माढा तालुक्यातील मोडनिंब याठिकाणी विवाहस्थळी एका बसने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली आहे. सुदैवाने या बसमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टाळला. पण या घटनेत बस जाळून राख झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या माढा तालुक्यातील मोडनिंब येथे विवाहस्थळी एका बसने अचानक पेट घेतल्याची थरारक घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी या आगीत बस कळून पूर्ण राख झाली आहे. या बसमधून वऱ्हाडी आल्याची माहिती समोर आली आहे. पण यावेळी नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळल्याचे बोलले जात आहे. आग लागली त्या बसमधून पुण्यातील वऱ्हाड आले होते अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. २३ फेब्रुवारी) रात्री पुण्याचा नवरदेव असलेले वऱ्हाड एका खाजगी बसमधून सोलापुरातील माढा तालुक्यात असलेल्या मोडनिंब येथे आले होते. हे वऱ्हाड मंगल कार्यालयात उतरल्यानंतर अचानक या बसने पेट घेतला. यावेळी तिथे असलेल्या नगरीकांनी वेळ न घालवता बसमधील चालकाला खाली उतरवले. त्यानंतर नागरिकांनी आणि लग्नात आलेल्या वऱ्हाड्यांनी बसला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न सुरु केला. तर लगेच या बसच्या बाजूला असलेली इतर वाहने देखील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर नागरिकांना रात्री उशिरा ही आग विझविण्यात यश आले आहे.
हेही वाचा – चुंचाळे शिवारात पुन्हा अग्नीतांडव; कचरा वेचणाऱ्यांचा संसार उघड्यावर
दरम्यान, आज (ता. २४ फेब्रुवारी) दुपारी ठरलेल्या वेळेवर हा लग्न सोहळा पार पडला. एक दिवस आधीच हे वऱ्हाड नवरीच्या घरी दाखल झाले होते. पण गुरुवारी रात्री अचानक घडलेल्या या घटनेने सर्व नागरिकांची आणि वऱ्हाडी मंडळींची पुरती तारांबळ उडाली होती. तर नागरिकांनी या घटनेत तत्परता दाखवल्याने खूप मोठी दुर्घटना होण्यापासून टळली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना घडल्याची माहिती देखील समोर आली आहे.